

88 police officers suspected of involvement in crimes have been arrested.
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
कोणत्याही गुन्ह्यात सहभागी असलेले पोलिस कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांविरुद्ध खटले दाखल केले जात असून त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई केली जात आहे, असा दावा गृहमंत्र्यांनी केला. तसेच राज्यातील अग्निशमन ठाण्यात आवश्यक असलेल्या अग्निशमन वाहनांच्या खरेदीसाठी पावले उचलण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. हिवाळी अधिवेशनादरम्यान गुरूवारी ते विधान परिषदेत बोलत होते.
परमेश्वर म्हणाले, आरोप सिद्ध झाले तर पोलिस नियमांनुसार अशा पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे. आतापर्यंत गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या ८८ पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना निलंबित करण्यात आले आहे. गुन्हा सिद्ध झाला, तर त्यांना सेवेतून बडतर्फ केले जाईल. अशा प्रकरणांमध्ये पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामावर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या गैरवर्तन, बेकायदेशीर कृत्ये आणि गुन्हेगारी कृत्यांबद्दलची कोणतीही माहिती त्वरित पोलीस गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर मुख्यालयाला कळवावी, असे निर्देश जिल्हास्तरीय उच्च अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
परमेश्वर म्हणाले, अग्निशमन विभागात १५ वर्षांहून अधिक काळ झालेली एकूण ३५८ वाहने आहेत. त्यापैकी ९३ वाहनांना पुढील ५ वर्षांसाठी मुदतवाढ देण्याची केंद्र सरकारला विनंती करण्यात आली आहे. तर १५० वाहनांची तरतूद केली जाणार असून यापैकी २५ वाहने अग्निशमन दलांना मंजूर करण्यात आली असून १५ वाहने अग्निशमन दलांना प्राप्त झाली आहेत. या वाहनांसाठी विमा, आरटीओ नोंदणी मिळवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित ११० वाहनांचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच सदर वाहने अग्निशमन दलांना दिली जाणार असल्याचे म्हटले आहे.
गेल्या अडीच वर्षांत राज्यात पोलिसांनी ६१ हजार २९९ स्वतःहून तक्रारी दाखल केल्या आहेत. दाखल केलेल्या सु- मोटो तक्रारींपैकी ५७ हजार ६४६ तक्रारींसाठी न्यायालयात आरोपपत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यापैकी एकही तक्रार मागे घेतली नसल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
सरकारी मालमत्तेचे नुकसान, बेकायदेशीर कामे, सरकारी कामात व्यत्यय, द्वेषपूर्ण भाषणसह राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्यास पोलिसांनी स्वतःहून तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये सामील असणाऱ्यांची चौकशी केली जाईल, असेही गृहमंत्री परमेश्वर यांनी म्हटले आहे.
3 हजार ६०० रिक्त जागा भरणार
राज्य पोलिस विभागात ३ हजार ६०० रिक्त पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यासाठी अधिसूचना जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली. परमेश्वर म्हणाले आरक्षण प्रक्रिया यापूर्वी अधिसूचित करण्यात आली असून ९४७उपनिरीक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे व उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. अलिकडेच १६७होमगार्ड कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.