![file photo](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F07%2Fcrime-news.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : पाच दिवसांपूर्वी एका भरधाव कारच्या धडकेत वीरूपक्षप्पा हरलापूर या फार्मसी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. हा अपघात नसून त्या आधिकाऱ्यांचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पूर्वनियोजित कट रचून त्यांचा खून करण्यात आला असून याप्रकरणी बुधवारी (दि.५) एपीएमसी पोलिसांनी सहा जणांना अटक केली.
बसवराज यल्लाप्पा भगवती (वय ५०), प्रकाश रामाप्पा राठोड (वय ४१), रामू लगमाप्पा वंटमुरी (वय २३), रवी बसू कुंभरगी (वय २४), महेश सिद्राम सुंकद (वय २४) व सचिन चंद्रकांत पाटील (वय २४, सर्वजण रा. कंग्राळी) अशी संशययित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, वीरूपाक्षप्पा हे बिम्समध्ये फार्मसी अधिकारी म्हणून काम करत होते. ३० मे रोजी ते चन्नम्मा सर्कलला उतरून चालत बिम्सकडे कामावर निघाले होते. यावेळी त्यांना एका भरधाव कारने धडक दिली होती. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वाहतूक उत्तर विभाग पोलिसांनी हिट अँड रन अशी नोंद करून घेतली होती. परंतु, त्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडून जलद गतीने तपास सुरू होता. या तपासाअंती एक धक्कादायक माहिती समोर आली. वीरुपक्षप्पा यांचा जाणीवपूर्वक अंगावर कार घालून खून केल्याचे उघडकीस आले. वीरूपाक्षप्पा याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या रागातूनच सहा जणांनी कट रचून त्याचा खून केला. एपीएमसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ख्वाजा हुसेन यांनी याचा सखोल तपास करून सहा जणांना अटक केली.