कर्नाटक विधानसभा निवडणूक : खाणार नाही म्हणणारा भाजपच खादाड; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ना खाऊंगा, ना खाने दूँगा. पण त्यांचेच कर्नाटकातील भाजप सरकार खादाड आहे. ते मोदींना दिसत नाही का, असा प्रश्न काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.
70 वर्षांत काँग्रेसने काय केले विचारता. देशात जी मोठी धरणे, महाविद्यालये, विमानतळ काँग्रेसनेच बांधली. 16 टक्के साक्षरता असलेल्या देशाची साक्षरता काँग्रेसने 70 टक्क्यांवर आणली. काँग्रेस शाळा सुरू केली म्हणून आज अमित शहा, मोदी साक्षर झाले, असेही खर्गे म्हणाले.
चिकोडी-सदलगा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खर्गे बोलत होते. ते म्हणाले, गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास जाती-धर्मामध्ये दंगा होईल असे वक्तव्य केले आहे. हा कर्नाटकच्या जनतेचा अपमान आहे. त्यामुळे याविरोधात न्यायालयात जाणार आहे.