अलमट्टीतून ७२ हजार ५०० क्युसेक विसर्ग
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दिवस कोसळणार्या पावसामुळे अलमट्टी धरणातून सोमवारी सकाळी 11 पासून तब्बल 72 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. अलमट्टी धरण आता 95 टक्के भरले आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातून विसर्ग 1 लाख क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
मागील दोन दिवसांपासून अलमट्टी धरणातून सहा हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी 8 वा. 42 हजार क्युसेक, सकाळी 11 पासून 72 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. अलमट्टी धरणाची क्षमता 123.01 टीएमसी असून, धरणामध्ये सद्या 117.376 टीएमसी पाणीसाठा आहे. हे धरण आता 95.41 टक्के भरले आहे. धरणात 37 हजार 41 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
विजापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस
विजापूर; पुढारी वृत्तसेवा : दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्या विजापुरात यंदा मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणची मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
मागील 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, सूर्यदर्शन झालेले नाही. अनेक ठिकाणी पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे.
अनेक मंदिरे पाण्याखाली असून संगमनाथ देवस्थान पाण्याखाली गेले आहे. मंदिराच्या गाभार्यात चार फूट पाणी आले आहे.