बेळगाव : भिंत कोसळून चुंचवाडमध्ये १५ वर्षीय मुलाचा मृत्यू | पुढारी

बेळगाव : भिंत कोसळून चुंचवाडमध्ये १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

खानापूर : पुढारी वृत्तसेवा; गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खानापूर तालुक्यातील लिंगनमठ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चुंचवाड गावातील अनंत धर्मेंद्र पाशेट्टी (वय १५) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.

त्याचे कुटुंबीय राहत असलेल्या घराशेजारील जुन्या घरात गुरे बांधत असतं. गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गोठ्यातील गायींना वैरण टाकण्यासाठी जात असताना अचानक त्याच्या अंगावर भिंत कोसळली. तो मातीच्या ढिगाऱ्याखाली चिरडला.

यावेळी झालेल्‍या मोठ्या आवाजाने कुटुंबियांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नंदागड पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तालुका रुग्णालयात पाठवण्यात आला.

हेही वाचा :  

Back to top button