Siddheshwar Dam canal condition
औंढा नागनाथ: तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातून निघणारा डावा व उजवा कालवा हा परिसरातील शेतीसाठी महत्त्वाचा जलस्रोत मानला जातो. मात्र, या कालव्यांची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पूर्णा पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे कालव्यांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाल्याचे चित्र समोर येत आहे.
विशेष म्हणजे हे कालवे बांधण्यात आल्यानंतर आजपर्यंत त्यांच्या पुनर्बांधणी किंवा मोठ्या दुरुस्तीचे कोणतेही काम करण्यात आले नसल्याची माहिती स्थानिक शेतकरी देत आहेत. परिणामी अनेक ठिकाणी कालव्यांना मोठमोठी भगदाडे पडली असून अनेक पूल तुटून धोकादायक झाले आहेत. काही ठिकाणी चीरबंदी बांधकाम उखडले असून पायऱ्याही मोडकळीस आल्या आहेत.
गोळेगाव, अंगणवाडी, पोटा परिसर, जवळा बाजार, भेंडेगाव आदी भागांमध्ये कालव्यांची अवस्था अधिकच गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी पुल निकामी झाले असून कालव्याच्या कडेला वाढलेल्या झाडाझुडपांमुळे जनावरांचे अपघात होत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. मोडकळीस आलेल्या पायऱ्यांमुळे नागरिकांनाही जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे.
कालव्यात पडलेल्या भगदाडांमधून लाखो लिटर पाणी वाया जात असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पाइपलाइनऐवजी कालव्याच्या भिंतीला छिद्रे करून थेट शेतात पाणी घेतल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे जलसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे.
दरम्यान, पाटबंधारे विभागाचे कर्मचारी केवळ पाणीपट्टी वसुलीपुरतेच सक्रिय असल्याची टीका शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कालव्यांच्या दुरुस्ती, सुरक्षितता आणि देखभालीकडे मात्र विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. “उंटावरून शेळ्या हाकण्याचा कारभार” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
कालव्यांलगत वाढणारे अपघात, वाया जाणारे पाणी, भगदाडे, तुटलेले पूल व पायऱ्या यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून पूर्णा पाटबंधारे विभागाने तातडीने लक्ष देऊन दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.