खोपोली शहर : दिलीप पवार
खोपोलीच्या सुभाष नगर परीसरात रविवारी सकाळी दरड कोसळली. दगड गोटे मातीचा लगदा रहिवासी घरापर्यंत पोहोचला सुदैवाने या घटनेत कोणती जीवीतहानी वा वित्तहानी झाली नाही. नगराध्यक्ष कुलदीप शेंडे, मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी दरडग्रस्त भागाची पहाणी करुन पुढील उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या.
सुभाषनगर मधील रहिवाशांनी संभाव्य धोक्याबाबत नगरपालिका प्रशासनाला यापूर्वी लेखी पत्र दिले असून. संभाव्य धोका लक्षात घेता दरड सदृश ठिकाणी संरक्षण कठडा बांधावा अशी मागणी केली जात असताना ही दुर्लक्ष केले जात आहे. २ हजार लोकसंख्या असलेल्या सुभाष नगर मधील रहिवाशांच्या डोक्यावर धोक्याची टांगती तलवार कायम आहे.
भविष्यात खालापूरची इरशाळवाडी, पुण्यामधील माळीन व महाड तळाई घटनांची पुनरावृत्ती होण्याची प्रशासन वाट पाहत आहेत का असा सवाल केला जात आहे . दरम्यान दरडप्रवण क्षेत्रातील रहीवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत असुन खोपोली पोलीस व तहसिल कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी दाखल होत जातीने लक्ष देत आहेत.
खोपोलीच्या सुभाषनगर भागातील २ हजार हजारच्या आसपासची लोकवस्ती दरडीच्या सावटाखाली मागील ३० वर्ष वावरत आहे. १०० मीटर लांब व ३ मीटर रुंदीची हि दरड खोपोलीकरांच्या चिंतेचा विषय बनून रहिली आहे. सन १९९० मध्ये खालापूर तहसीलदार नाईक यांनी सुभाषनगर दरडीचा अहवाल शासनाला दिला होता.
२००५ मध्ये तत्कालीन तहसीलदार अशोक म्हात्रे यांनी भूगर्भ खात्याचा अहवाल घेत सुभाषनगर मधील ३५० घरांना खोपोलीच्या मिळ्गाव येथे स्थलांतरित करण्याच्या लेखी सूचना दिल्या होत्या. मात्र रहिवाश्यांनी आधी पुनर्वसन करा मगच जागा सोडू असा ठाम नकार दिला होता.
२०१० मधे वादातीत असलेल्या दरडीच्या भागातील महाकाय दगड कोसळला होता. सुदैवाने हा दगड वडाच्या झाडाला अडल्याने मोठा अनर्थ टळला होता. सन २०१६ मध्ये हि शासकीय अधिकार्यांनी पाहणी केली होती. मात्र स्थलांतराचा मुद्दा शासनाचे काम आणि थोडावेळ थांब अशी अवस्था असल्याने दिरंगाई होत आहे.