मुंबई : पुढारी वृत्तसेवा : ढोल, ताशा आणि हलगीच्या ठेक्यावरील प्रचार संपलेल्या राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी रविवार, १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५. ३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ देण्यात आली आहे. या निवडणुकीची मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार असून, विजयाचा गुलाल कोणा- कोणाच्या अंगावर पडेल, याचे चित्र मंगळवारी दुपारपासून स्पष्ट होईल.
राज्यात २०१९ मध्ये भाजप – शिवसेनेचे सरकार असताना सरपंच पदासाठी थेट निवडणुक पद्धत सुरु करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने बंद केलेली ही पद्धत शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सुरु केली आहे. त्यामुळे सरपंच पदाच्या उमेदवारांमागे स्थानिक आमदार आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ताकद लावली आहे. मिनी विधानसभा निवडणूक समजून आमदारांनी ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराला रसद पुरवल्याची चर्चा आहे.
शिंदे फडणवीस सरकारकडील सध्याचा बहुमताचा आकडा पाहता, राज्यात दोन वर्षांनी विधानसभा निवडणुका होतील, असे चित्र आहे. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेऊन स्थानिक आमदारांनी आपल्या बेगमीसाठी ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात आश्वासनांची खैरात केली असल्याची चर्चा आहे. २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर मतदारांनी शिंदे फडणवीस सरकारला साथ दिली आहे की, महाविकास आघाडीला हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.
ठाणे ४२, पालघर ६३, रायगड २४०, नाशिक १९६, धुळे १२८, नंदुरबार १२३, जळगाव १४०, अहमदनगर २०३, रत्नागिरी २२२, सिंधुदुर्ग ३२५, कोल्हापूर ४७५, पुणे २२१, सांगली ४५२, सातारा ३१९, सोलापूर १८९, औरंगाबाद २१९, बीड ७०४, हिंगोली ६२, जालना २६६, लातूर ३५१, उस्मानाबाद १६६, परभणी १२८, नांदेड १८१, वर्धा ११३, नागपूर २३७, वाशीम २८७,भंडारा ३६३, बुलडाणा २७९, चंद्रपूर ५९ ,
गडचिरोली २७, गोंदिया ३४८, अकोला २६६, अमरावती २५७ आणि यवतमाळ १००.
हेही वाचा :