Uncategorized

औरंगाबाद : रिक्षा बंद आंदोलन; सिटीबस ‘फुल्ल’, प्रवाशांची गर्दीने बसस्थानके भरली

अमृता चौगुले

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : कॅलिब्रेशनसाठी 28 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करत रिक्षा चालक-मालक कृती समितीने आजपासून (1 डिसेंबर) रिक्षा बंद आंदोलन पुकारले आहे.सकाळपासूनच शहरात रिक्षा गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे शहरात विविध ठिकाणी उभारलेल्या स्मार्ट सिटी बसची स्थानके आणि धावणाऱ्या बसेसही प्रवाशांच्या गर्दीने फुल्ल झाले आहेत. रिक्षा चालकांच्या बंदमुळे स्मार्ट सिटी बसचा प्रवास शहरवासी अनुभवत आहेत.

दुसरीकडे बंदच्या पार्श्वभूमीवर आरटीओ अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.30) रिक्षा चालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात रिक्षा मीटर कॅलिब्रेशनसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णयही जाहीर केला, मात्र रिक्षा चालक-मालक संघटना बंदवर अडून राहिल्या. या बंदमध्ये 15 संघटना सोबत असल्याचा दावा रिक्षा चालक-मालक कृति समितीचे अध्यक्ष सलीम खामगावकर यांनी सांगितले.

शहरातील सर्वाधिक रिक्षा या जालना रोडवरून धावतात, आज मात्र मोजक्याच रिक्षाचालक रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत आहेत. बंद यशस्वी करण्यासाठी काही रिक्षाचालकांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा थांबवून, प्रवाशांना तिथेच उतरवून देण्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच प्रवाशांची अडवणुक करत जादा भाडे आकारण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत.

सिटीबसमुळे प्रवाशांना किंचित दिलासा… 

रिक्षा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे, तर दुसरीकडे स्मार्ट सिटी बसेसमध्ये गर्दी वाढली आहे. दिसेल तिथे हात दाखवून रिक्षा थांबवणे व प्रवास सुरु करणे, अशी नागरिकांची सवय आज मात्र मोडली आहे. बसची वाट पाहण्यासाठी स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या नजरा आता बसकडे लागलेल्या आहेत.

.हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT