नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 पर्यंत प्रत्येक बेघराला निवारा देण्याची घोषणा केलेली आहे. पण पंतप्रधानांच्या या घोषणेची पूर्तता होण्यासाठी अवघ्या वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना, जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत केवळ 593 घरकुले पूर्णत्वास आली आहेत. यंत्रणांची कामातील कासवगती बघता सर्वसामान्यांना हक्काच्या निवार्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
प्रत्येक बेघराच्या डोक्यावर हक्काचे छप्पर असावे, यादृष्टीने पंतप्रधान मोदी यांनी देशभरात पंतप्रधान आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. ही योजना शहरी, निमशहरी व ग्रामीण भाग अशा तीन टप्प्यांत राबविली जात आहे. त्यासाठी यंत्रणांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. कमी खर्चात घरकुलाचे स्वप्न साकारणार असल्याने समाजातून योजनेला चांगला प्रतिसाद लाभतो आहे. मात्र जिल्ह्यात यंत्रणांच्या संथ कारभारामुळे लाभार्थींना हक्काच्या घरापासून दूर राहावे लागत आहे. जिल्ह्यातील 15 नगर परिषद क्षेत्रात पाच वर्षांत 13 1 घरकुले उभारण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. त्यासाठी 81 कोटी 48 लाख 51 हजारांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाला 38 कोटींच्या आसपास निधीही प्राप्त झाला आहे. परंतु, सद्यस्थितीत नगरपालिका क्षेत्रात 1,304 घरकुलांना मान्यता मिळाली असून, प्रत्यक्षात केवळ 631 घरांची कामे सुरू आहेत. आतापर्यंत 593 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. त्यावर 17 कोटी 34 लाखांचा खर्च झाला आहे. एकूणच कामांची प्रगती बघता पुढील वर्षापर्यंत लाभार्थींचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.
नगरपालिका क्षेत्रांमध्ये जागेचा प्रश्न
नगरपालिका क्षेत्रांमध्ये घरकुल उभारणीसाठी जागांचा प्रश्न प्रशासनाला भेडसावतो आहे. जागा तातडीने हाती मिळत नसल्याने कामांमध्ये अडचणी निर्माण होत असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच 15 नगर परिषदांच्या क्षेत्रात आजमितीस 40 हून अधिक झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले आहे.
घरकुलांचे उद्दिष्ट व पूर्ती….
नगरपालिका उद्दिष्ट पूर्ण
मनमाड 3444 125
येवला 2100 54
सिन्नर 2683 76
नांदगाव 1039 18
चांदवड 313 41
सटाणा 409 59
त्र्यंबकेश्वर 466 55
इगतपुरी 1389 65
भगूर 503 18
निफाड 200 36
कळवण 253 08
सुरगाणा 450 00
पेठ 123 00
दिंडोरी 219 00