सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे तीन वर्षाच्या मुलीसह स्वतः गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी, (दि. 8 ऑगस्ट) रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान कोरवली येथे घडली आहे. प्रीती विजयकुमार माळगोंडे (वय 25) तर आरोही विजयकुमार माळगोंडे (वय 3) असे मृत माय लेकीचं नाव आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतीचे पाच वर्षांपूर्वी कोरवली येथील विजयकुमार माळगोंडे यांच्याबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर प्रीती व विजयकुमार हे दापत्य त्यांच्या शेतातील घरात राहत होते. त्यांना मुलगी आरोही (मयत) व मुलगा बसवराज असे दोन मुले होती.
दीड वर्षापासून पती विजयकुमार हा पत्नी प्रीतीस शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण व शिवीगाळ करीत होता. दरम्यान या दाम्पत्याने सोमवारी सकाळी दहा वाजता गावातील महादेव मंदिरात येऊन अभिषेक घालून गेले होते. सोमवारी दुपारी प्रीतीने आपला भाऊ मल्लिनाथ याला तू का फोन केला म्हणून विजयकुमारने प्रीतला चाबकाने व चपलाने मारहाण करून धमकी दिली. धमकी देऊन तो जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी शेतात गेला होता.
तिने सततच्या त्रासाला कंटाळून मुलगी आरोही व मुलगा बसवराज (वय दीड वर्षे) यांना राहते घरी पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास देऊन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मुलगा बसवराज याला गळफास व्यवस्थित न बसल्याने मुलगा बसवराज याचा जीव वाचला आहे.
मयताचा भाऊ मल्लिनाथ राजशेखर मंगरूळे (रा. हत्तुर, ता. दक्षिण सोलापूर) यांनी प्रीतचा पती विजयकुमार हा माझे बहिणीस सतत शिवीगाळ मारहाण दमदाटी करीत होता. त्यामुळे माझ्या बहिणीने आत्महत्या केली आहे. अशा प्रकारची फिर्याद विजयकुमार माळगोंडे यांच्यावर दाखल केली आहे. तर मयताचे पतीने विजयकुमार माळगोंडे यांनी माझी मुलगी आरोही हीला गळफास लावून तिला जीवे मारून स्वतःही साडीने गळफास घेऊन पत्नी मयत झाली आहे. म्हणून मयत पत्नी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.