जळगाव : पुढारी वृत्तसेवा – यावल तालुक्यातील दहीगावात दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता त्यावरुन याठिकाणी 48 तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दहीगावातील तणावाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मानगावकर यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रभारीपदी रावेरचे सपोनि हरीष भोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
यावल तालुक्यातील दहिगाव येथे (दि. 7) च्या रात्री दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत वातावरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. (दि. 8) रोजी दिवसभर गावात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण दिसून आले. दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा फैजपुरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अर्पित चौहान यांनी दहिगावात ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेपासून ४८ तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे. या संदर्भातील निर्देश जारी करण्यात आले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत कुणालाही घराबाहेर पडता येणार नसून अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने देखील बंद राहणार आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ (१) अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या दंगलीच्या विषयाला घेवून यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची जळगाव येथील पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रावेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांची प्रभारीपदी नियुक्त करण्यात आली आहे. अशी माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली आहे. या बदलीमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :