राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : राजगुरूनगर परिसरातून जाणाऱ्या पुणे- नाशिक महामार्गावर गुरुवारी (दि. ७) प्रचंड वाहतूक कोंडी झाली. भर पावसात सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत, असा चार तासांहून अधिक काळ महामार्ग ठप्प झाला होता. परिणामी वाहनचालक, प्रवासी हैराण झाले.
संथ गतीने पुढे जाणाऱ्या वाहतुकीमुळे शहराच्या दोन्ही बाजूंना तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील कोंडीमुळे शहरांतर्गत रस्ते, चौकही ठप्प झाले. वर्दळीतून मार्ग काढताना नोकरदार, महिला, विद्यार्थी यांचे हाल झाले. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व वाहनांनादेखील संथगतीने प्रवास करावा लागला.
राजगुरूनगर शहरातून जाणाऱ्या पुणे- नाशिक महामार्गावर रोज वाहतूक कोंडी होते. शहरात असलेला अरुंद महामार्ग व वाढलेली अतिक्रमणे यामुळे रस्ता लहान झाला आहे. महामार्ग चौपदरीकरण झालेला असल्याने वाहने सुसाट वेगाने, घाईघाईने येतात आणि राजगुरूनगरला अडकून राहतात. सण, शासकीय सुट्या असे काही दिवस शहरवासीयांना पराकोटीची वाहतूक कोंडी सहन करावी लागते. अवजड वाहतूकसुध्दा कोंडीला कारणीभूत ठरते आहे.
सर्वाधिक त्रास पुणे येथे अत्यावश्यक सेवांसाठी जाणाऱ्यांना तसेच रुग्णवाहिकेतील रुग्णांना झाला. राजगुरूनगर शहरातील अवजड वाहतूक कोंडीतून पुणे- नाशिककडे जाण्यासाठी अडकून राहावे लागले. आतापर्यंत राजगुरूनगर, चाकणच्या वाहतूक कोंडीत वेळेत उपचाराअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. गुरुवारी सकाळपासून परिसरात जोरदार पाऊस पडत होता. अशातच वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी व रुग्णवाहिकांमध्ये अडकलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल झाले. पोलिसदेखील नित्याच्या कोंडीला कंटाळले आहेत. राजगुरूनगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी शहर परिसरातून होत आहे.