नाशिक : पुढारी वृत्तसेवा, या शहराला पौराणिक व ऐतिहासिक वारसा असून, दर 12 वर्षांनी येथे होणारा कुंभमेळा जागतिक स्तरावर हे शहर अधोरेखित आहे. शहरात पूर्वीपेक्षा अधिक गर्दी वाढल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. नाशिकची ओळख तीर्थक्षेत्र म्हणून कायम ठेवल्यास निश्चितच पर्यावरणाचेही संरक्षण होईल यात शंका नाही, असे मत जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
संबधित बातम्या :
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. ३) आयोजित 'चला जाणू या नदीला' उपक्रमांतर्गत चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी आध्यात्मिक गुरू श्री एम., जिल्हाधिकारी जलज शर्मा, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपवनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, नमामि गोदा फाउंडेशनचे राजेश पंडित, नरेंद्र चुग, अभिनेते चिन्मय उदगीरकर, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.
डॉ. सिंह म्हणाले की, जिल्ह्यातील वनसृष्टी ही नद्यांची माता आहे. जंगलांच्या संवर्धनासाठी प्रशासनस्तरावर जंगलाच्या सीमा निश्चित झाल्यास अतिक्रमण व जंगलतोड थांबण्यास मदत होईल. ब्रह्मगिरीवरील कुंडांचे पुनरुज्जीवन केल्यास नद्यांची पाणीपातळी उगमस्थापासून वाढेल. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याबद्दल आतापासूनच आवश्यक उपायायोजनेची अपेक्षा सिंह यांनी व्यक्त केली.
श्री एम. म्हणाले की, बैठकीत सदस्यांनी सुचविलेल्या सूचनांवर अंमलबजावणी व्हावी. तसेच नदी प्रदूषण रोखणे व आगामी कुंभ प्लास्टिकमुक्त होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. गर्ग यांनी 'चला जाणू या नदीला' मोहिमेबाबत समितीमार्फत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी उपस्थित सदस्यांनीही सूचना मांडल्या.
नद्यांसाठी टास्कफोर्स : शर्मा
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी शासन व जिल्हास्तरावर आवश्यक उपाययोजना राबविल्या जात आहेत. वालदेवी, कपिला, नंदिनी, म्हाळुंगी व मोती या नद्यांसाठी सोलापूर जिल्ह्याच्या धर्तीवर टास्कफोर्सची निर्मिती करून प्रत्येक नदीसाठी एक नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल. नदी प्रदूषणमुक्तीसाठी मोठ्या स्वरूपाच्या कार्यक्रमांची आखणी केली जाईल, असे शर्मा म्हणाले.
हेही वाचा :