Vijay Hazare Trophy 2025 file photo
स्पोर्ट्स

Vijay Hazare Trophy 2025: विराट-रोहित अचानक विजय हजारे ट्रॉफीतून बाहेर; नेमकं कारण काय?

विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये आज (दि. २९) तिसऱ्या फेरीचे सामने खेळले गेले. मात्र, या फेरीत विराट कोहली आणि रोहित शर्मा अनुक्रमे दिल्ली आणि मुंबईकडून मैदानात दिसले नाहीत.

मोहन कारंडे

Vijay Hazare Trophy 2025

नवी दिल्ली : विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये आज (दि. २९) तिसऱ्या फेरीचे सामने खेळले गेले. मात्र, या फेरीत विराट कोहली आणि रोहित शर्मा अनुक्रमे दिल्ली आणि मुंबईकडून मैदानात दिसले नाहीत. दिल्लीचा सामना अलूर येथील केएससीए स्टेडियमवर सौराष्ट्रविरुद्ध झाला, तर मुंबईचा संघ जयपूरच्या जयपूरिया विद्यालय मैदानावर छत्तीसगडविरुद्ध खेळायला उतरला.

विराट कोहलीने दिल्लीसाठी खेळलेल्या दोन सामन्यांत शानदार कामगिरी केली. त्याने आंध्र प्रदेशविरुद्ध १३१ आणि गुजरातविरुद्ध ७७ धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, रोहित शर्माने सिक्कीमविरुद्ध १५५ धावांची धडाकेबाज खेळी केली, पण उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

निवडक सामन्यांसाठीच झाला होता करार

आता प्रश्न असा आहे की, विराट आणि रोहित तिसऱ्या फेरीत का खेळले नाहीत? खरं तर, रोहित आणि कोहली या स्पर्धेत केवळ मर्यादित सामने खेळण्यास सहमत झाले होते. या दोन्ही खेळाडूंनी केवळ दोन सामने खेळण्याचे आश्वासन दिले होते. कोहली आणि रोहित स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांत आपापल्या संघांसाठी खेळायला उतरले होते.

कोहली ६ जानेवारीचा सामना खेळणार का?

आता विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना या स्पर्धेत आणखी सामने खेळायचे आहेत की नाही, हे पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. ११ जानेवारीपासून भारताला न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे, त्यामुळे या दोन्ही खेळाडूंचे लक्ष त्या आंतरराष्ट्रीय मालिकेवर असणार आहे. 'क्रिकबझ'च्या अहवालानुसार, कोहली ६ जानेवारी रोजी रेल्वेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात दिल्लीकडून पुन्हा एकदा खेळू शकतो. मात्र, रोहित आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी पुढे खेळणार नाही, असेही या अहवालात म्हटले आहे.

बुमराह आणि हार्दिकला विश्रांती मिळण्याची शक्यता

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांना न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. आगामी मोठे सामने, विशेषतः २०२६ चा टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, हे दोन्ही खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सहभागी होतील, ज्यासाठी संघ आधीच जाहीर झाला आहे.

न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका भारताची विश्वचषकापूर्वीची शेवटची टी-२० मालिका असेल. त्यामुळे बुमराह आणि हार्दिक पाचही सामने खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हार्दिकने शेवटचा वनडे सामना यावर्षी मार्चमध्ये 'आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी'च्या अंतिम सामन्यात खेळला होता, तर बुमराह २०२३ च्या विश्वचषक फायनलनंतर वनडे क्रिकेटपासून दूर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT