Virat Kohli Property Gave General Power of Attorney To Brother :
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानं आपली भारतातील सर्व संपत्तीची Power of Attorney आपल्या भावाला दिली आहे. विराट कोहलीनं आपली गुरूग्राममधील एक महागडी प्रॉपर्टी मोठा भाऊ विकासच्या नावावर केली आहे. यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करण्यात आला आहे. विराटनं या प्रॉपर्टीची पॉवर ऑफ अटॉर्नी आपल्या भावाला दिली आहे.
विराट कोहलीनं भावाला गुरूग्राममधील ज्या प्रॉपर्टीची पॉवर ऑफ अटॉर्नी दिली आहे त्याचे मुल्य हे जवळपास ७.११ कोटी रूपये आहे. ही प्रॉपर्टी डीएलएफ फेज १ या भागात आहे. याबाबतच्या कायदेशीर कागदपत्रांची पुर्तता १६ सप्टेंबर २०२५ मध्ये गुरूग्राम सब रजिस्ट्रार कार्यालयात करण्यात आली.
सर्वसाधारण भाषेत सांगायचं झालं तर जनरल पावर ऑफ अटॉर्नी हा एक कायदेशीर कागद असतो. याद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपल्या संपत्तीशी संबंधित जे काही काम करायचे आहेत त्याचा पूर्ण अधिकार देऊ शकतो.
जर विराट कोहली देशाच्या बाहेर असेल आणि त्याला कागदपत्रासंदर्भात काही काम करण्यास वेळ नेसल तर त्याचा भाऊ हे सर्व काम करू शकतो. यासाठी त्याला कायदेशीर अधिकार जनरल पॉवर ऑफ अटॉर्नीमुळे मिळतो. यामध्ये प्रॉपर्टी भाड्यानं देणं, ती विकणं किंवा त्याचा मेंटेनन्स याबाबतचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार त्याच्या भावाला विकासला मिळणार आहे. पॉवर अटॉर्नीसाठी सरकारला एक फी द्यावी लागते. विराटच्या केसमध्ये ही फी ३५.६१ लाख रूपये इतकी होती.
प्रसिद्ध व्यक्ती सहसा संपत्ती मॅनेज करण्यासाठी पॉवर ऑफ अटॉर्नीचा वापर करतात. यामुळं त्यांचा प्रॉपर्टीसंदर्भातील छोटी मोठी कामे करण्यात वेळ वाया जात नाही.
विराट कोहली हा भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आहे. त्याचा फॅन बेस करोडोमध्ये आहे. त्यामुळं त्याला अशा छोट्या छोट्या सरकारी कामांसाठी सारखं सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत नाही. त्यामुळेच विराट कोहलीनं त्याच्या प्रॉपर्टीची पॉवर ऑफ अटॉर्नी भावाला दिली असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
विशेष म्हणजे विराट कोहली सध्या कुटुंबासह बराच काळ लंडनमध्येच वास्तव्याला आहे. तो तिकडेच सेटल होणार का अशी देखील चर्चा आहे. त्यातच आता तो भारताकडून फक्त वनडे सामने खेळत आहे. नुकत्याच झालेल्या संघनिवडीनंतर रोहित आणि विराटचे संघातील स्थान अबाधित राहिल याची शाश्वती नाही. त्यामुळं तो लवकरच निवृत्ती घेतो का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी विराट आरसीबीसोबतचा व्यावसायिक करार देखील रिन्यू केलेला नाही असं वृत्त बाहेर आलं होतं. त्यानंतर त्याला स्वतःला सोशल मीडिया पोस्ट करत वृत्त खोटं असल्याचा खुलासा द्यावा लागला होता.