Virat Kohli RCB IPL 2026 Message: IPL 2026 चा हंगाम सुरू होण्याआधीच विराट कोहलीने Royal Challengers Bengaluru संघाला इशारा दिला आहे की, “एक मिनिटही वाया घालवू नका, पूर्णपणे ‘स्विच ऑन’ व्हा!” बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या पहिल्या सराव सत्रात कोहलीने सहकाऱ्यांना गेल्या हंगामात मिळवलेल्या यशामागच्या मेहनतीची आठवण करून दिली.
त्यांनी सांगितले की, मागील दोन-तीन वर्षांत संघाने प्रचंड मेहनत घेतली आणि त्याचे फळ म्हणजे विजेतेपद. मात्र आता ही लढाई आणखी कठीण होणार आहे, कारण इतर सर्व संघ RCB ला हरवण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत.
कोहलीने संघातील प्रत्येक खेळाडूला सुरुवातीपासूनच तयारी करण्याचा सल्ला दिला आहे. “हे दिवस वाया घालावू नका. प्रत्येक सराव सत्राचा पूर्ण उपयोग केला पाहिजे. पुढील अडीच महिने आपल्याला 120 टक्के देणं गरजेचं आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्याने सांगितलं आहे.
RCB आपला पहिला सामना 28 मार्च रोजी Sunrisers Hyderabad विरुद्ध याच मैदानावर खेळणार आहे. घरच्या मैदानावर सुरुवात होणार असल्याने संघासाठी ही जमेची बाजू आहे.
यंदाच्या लिलावात RCB ने व्यंकटेश अय्यर, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्तवाल आणि सात्विक देशवाल यांसारख्या नव्या खेळाडूंना संघात सामील केले आहे. त्यामुळे संघ अधिक संतुलित आणि मजबूत झाला आहे.
संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनीही संघाच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, लिलावानंतर संघातील कमकुवत बाजूंवर काम झाले आहे. “यंदा आमच्या जर्सीवर स्टार आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. पण मागील यश विसरून नव्या आव्हानासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मानेही संघातील वातावरण सकारात्मक असल्याचे सांगितले. नव्या आणि जुन्या खेळाडूंमध्ये चांगली केमिस्ट्री तयार होत असून सराव सत्रांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
एकूणच, RCB संघ IPL 2026 मध्ये विजेतेपद टिकवण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे. कोहलीचा आक्रमक आणि प्रेरणादायी मेसेज, नव्या खेळाडूंची भर आणि घरच्या मैदानावर होणारी सुरुवात, या सगळ्यांमुळे RCB पुन्हा एकदा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहे.