स्पोर्ट्स

Gautam Gambhir Power : ‘गंभीर’ गुरुजींचा ‘पॉवर गेम’! भारतीय क्रिकेटने अनुभवली पहिल्यांदाच प्रशिक्षकाची ताकद

विराट-रोहित यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघात नवीन चेहरे दिसतील. या दोन्ही निवृत्तींमध्ये टीम इंडियाचे मुख्य कोच गौतम गंभीर यांची भूमिका नाकारता येणार नाही.

रणजित गायकवाड

virat-rohit retirement indian cricket experienced the power of coach gautam gambhir play imp roll

मुंबई : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत असताना माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्रेग चॅपेल यांनी जेव्हा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना पद सोडावे लागले. अनिल कुंबळे ‘सुपरस्टार संस्कृती’मुळे त्रस्त होऊन गेले. मात्र, असं वाटतं की गौतम गंभीर हे भारतीय क्रिकेटमधील असे दुर्मीळ मुख्य प्रशिक्षक आहेत, ज्यांच्याकडे कर्णधारापेक्षा जास्त ताकद आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये अशी असंख्य उदाहरणे आहेत जेव्हा खेळाडूंच्या ताकदीपुढे मजबूत प्रशिक्षकांनाही माघार घ्यावी लागली होती. बिशन सिंग बेदी, चॅपेल आणि कुंबळे हे स्वतः चॅम्पियन खेळाडू होते, पण त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नसेल की कोच म्हणून काम करताना त्यांना कर्णधाराच्या सहाय्यकाची भूमिका बजावावी लागेल.

आता टेस्टमध्ये दिसतील नवे चेहरे

जॉन राईट, गॅरी कर्स्टन आणि रवी शास्त्री यांना हे माहीत होतं आणि ते खूप यशस्वी ठरले. विराट कोहली, रविचंद्रन अश्विन आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर टेस्ट संघात आता मोठे स्टार खेळाडू उरलेले नाहीत, त्यामुळे गंभीर यांना क्रिकेटच्या पटावर आपले मोहरे मोकळेपणाने चालवण्याची संधी मिळेल. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, गंभीर आधीच हे ठरवून आले होते की संघातून 'स्टार कल्चर' संपवायचं आहे. सूत्राने सांगितलं, 'गौतम गंभीर युगाची सुरुवात आता झाली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या चक्रात भारताला नवे चेहरे हवेत.'

गंभीर यांना नव्या खेळाडूंकडून खूप अपेक्षा

सूत्राने सांगितले, 'संघ व्यवस्थापनातील सर्वांना माहिती होते की टेस्ट फॉरमॅटमध्ये वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्यासंदर्भात गंभीर काय विचार करतात. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर हेही त्यांच्या मताशी सहमत होते.' भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधार नेहमीच सर्वात प्रभावशाली व्यक्ती राहिले आहेत. सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, कोहली आणि रोहित हे कर्णधार असताना या सर्वांची संघ निवडीत निर्णायक भूमिका होती. पण गंभीरच्या काळात असं नाही.

राहुल द्रविड़ आणि रोहित शर्मांची जोडी जरी थोड्याच काळासाठी होती, तरी ती प्रभावी ठरली. मात्र, रोहित आणि गंभीर यांची जोडी कधीच सहज वाटली नाही. प्रथमच मोठ्या स्टार खेळाडूंच्या एक्झिटमध्ये प्रशिक्षकाची महत्त्वाची भूमिका राहिल्याची जोरदार चर्चा आहे, पण ही ताकद दुधारी तलवार ठरू शकते.

असं समजलं जातं की भारतीय क्रिकेटमधील या बदलाच्या टप्प्यात गंभीर यांना हवं होतं की बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आणि न्यूझीलंड मालिकेतील अपयशाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांना पूर्ण मोकळीक मिळावी. शुभमन गिल यांच्या रूपाने त्यांच्याकडे एक तरुण कर्णधार आहे जो त्यांचं ऐकेल.

गिल एक स्टार खेळाडू आहे, पण अजून त्याला इतकं मोठं स्थान मिळालेलं नाही की तो गंभीर यांच्या निर्णयांवर किंवा रणनीतीवर प्रश्न उपस्थित करू शकेल. फक्त एकाच खेळाडूकडे तो दर्जा आहे तो म्हणजे जसप्रीत बुमराह. पण त्यांच्या फिटनेसच्या अस्थिरतेमुळे त्यांचं कर्णधार बनणं शक्य नाही. अशा परिस्थितीत गंभीरकडे संपूर्ण ताकद असेल, पण वनडेमध्ये त्यांना सावधगिरीने काम करावं लागणार हे निश्चित. पण रोहित आणि कोहली यांचे लक्ष्य 2027 च्या विश्वचषकावर आहे. ते तो पर्यंत वनडे संघाचा भाग असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT