Vaibhav Suryavanshi Team India Debut: वैभव सूर्यवंशी हा नक्कीच या पिढीतील एक गुणवंत खेळाडू आहे. या १४ वर्षाच्या मुलाने भारताकडून खेळलेल्या शार्दुल ठाकूरला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता. हा फटका शार्दुलच्या अजूनही लक्षात आहे. यावेळी संपूर्ण क्रिकेट जगत स्तब्ध झालं होतं.
आता हाच भारताचा उद्योन्मुख खेळाडू आयपीएल २०२६ मध्ये पुन्हा एकदा धमाका करण्यासा सज्ज झाला आहे. आयपीएल हंगामाच्या पूर्वसंध्येला वैभव सूर्यवंशी हा १५ वर्षाचा होतोय. वैभव आयपीएलचा आपला दुसरा हंगाम खेळत आहे. वैभवने दोन आयपीएल हंगामादरम्यान, आपल्या बॅटने दमदार कामगिरी करत आपलं वय छोटं आहे मात्र कामगिरी एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळाडूसारखी आहे हे दाखवून दिलं. विशेष म्हणजे एखाद्या १९ वर्षाच्या खेळाडूपेक्षा देखील त्याच्या कामगिरीचा दर्जा हा उच्च आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान देण्यात यावं अशी अनेक क्रिकेट चाहत्यांची मागणी होती. टी २० संघात त्याची आक्रमकता अजूनच खुलून येईल असा अनेक जाणकारांचा अंदाज आहे.
वैभव सूर्यवंशी जरी दमदार कामगिरी करत असला तरी त्याला इतक्यात टीम इंडियात घेण्यासाठी एक नियम आड येत होता. मात्र या वयाच्या नियमाचा अडथळा आता दूर झाला आहे. आयसीसीच्या नियमानुसार पंधराव्या वर्षीच एखाद्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय पदार्पण करता येतं. आता वैभवने ही पात्रता पार केली आहे. आता त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यापासून कोणताही नियम रोखू शकणार नाहीये.
मात्र नियमानुसार पात्र असणं आणि प्रत्यक्ष निवड होणं यात जमीन अस्मानचा फरक आहे. वैभव सूर्यवंशीचा राईज हा इतर खेळाडूंपेक्षा खूप वेगळा आहे. १२ व्या वर्षापासून तो स्थानिक गोलंदाजंची कुटाई करत होता. आता तर त्यानं आयपीएलमध्ये ३५ चेंडूत शतक ठोकलं आहे. १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये ४३९ धावा ठोकून मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्याचे धावांमधील आणि कामगिरीमधील सातत्य नेक्स्ट लेव्हल आहे. रणजी ट्रॉफीमध्ये देखील त्यानं चांगली कामगिरी केली असून विजय हजारेचा हंगाम देखील गाजवला आहे.
आता वैभवला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवावं का असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी वैभवची आकडेवारीच उत्तर आहे. वैभवचं टीम इंडियातील पदार्पण हे दिवास्वप्न नसून त्यानं त्याच्यावर आपला हक्क सांगितला आहे. सचिन तेंडुलकरने वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. पाकिस्तानच्या हसन रझाने १४ व्या वर्षी पदार्पण केलं.
सध्याच्या क्रिकेट जगतात खेळाडूचे वय नाही तर तो टी २० क्रिकेट खेळण्यासाठी किती तयार आहे याच्यावर त्याचे पदार्पण होते. मात्र असं असलं तरी वैभवच्या बाबतीत निर्णय घेताना निवडसमितीला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला लागणार आहे. सध्याच्या घडीला भारताचा मर्यादित षटकांचे संघ हे पॅक झाले आहेत.
विशेष करून टॉप ऑर्डरमध्ये अनेक खेळाडू रांग लावून बसले आहेत. राजस्थान रॉयल्सचाच यशस्वी जैस्वाल हा पुन्हा एकदा टी २० संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळं सूर्यवंशीला आताच संघात खेळवण्याची तातडीची गरज नाहीये. या वर्षी एशियन गेम्समध्ये वैभव सूर्यवंशीला कदाचित भारताकडून पदार्पणाची संधी मिळू शकते.