मुंबई : सुपर-८ फेरीत टीम इंडियाचे अजून दोन सामने शिल्लक आहेत, परंतु सध्या क्रीडावर्तुळात एकच महत्त्वाचा प्रश्न चर्चिला जात आहे तो म्हणजे भारत उपांत्य फेरी गाठणार का? सुपर-८ च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला की, त्यामुळे भारताचा नेट रनरेट पूर्णपणे कोलमडला आहे. परिणामी, चाहत्यांमध्ये साशंकतेचे वातावरण आहे. मात्र, नेट रनरेटची चिंता न करताही भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकतो का? तर याचे उत्तर 'हो' असे होऊ शकते. परंतु, त्यासाठी एका दुसऱ्या संघाच्या कामगिरीवर भारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केल्यामुळे भारताचे केवळ दोन गुणच निसटले नाहीत, तर रनरेटलाही मोठा फटका बसला आहे. या नुकसानीची भरपाई करणे जवळपास अशक्य वाटते. एकीकडे दक्षिण आफ्रिकेचा रनरेट उच्चांकी असतानाच, वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा १०७ धावांनी धुव्वा उडवत रनरेटमध्ये अव्वल स्थान पटकावले. अशा स्थितीत जर भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या तिन्ही संघांचे गुण समान झाले आणि फैसला नेट रनरेटवर आला, तर टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर पडणे निश्चित आहे. म्हणूनच, रनरेटचे चित्र विचारात न घेता पुढे जाण्याचा मार्ग कोणता, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठीचे समीकरण अतिशय स्पष्ट आहे.
१. भारताला आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील, ज्यामुळे भारताचे चार गुण होतील.
२. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करणे आवश्यक आहे.
जर असे झाले, तर दक्षिण आफ्रिकेचे सहा गुण, भारताचे चार आणि वेस्ट इंडिजचे केवळ दोन गुण राहतील. परिणामी, भारत दुसऱ्या स्थानावर राहून थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. येथे नेट रनरेटची कोणतीही भूमिका नसेल. मात्र, जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले, तर गणित बिघडू शकते. अशा स्थितीत दोन सामने जिंकूनही भारताचे आव्हान संपुष्टात येऊ शकते, कारण तिन्ही संघांचे प्रत्येकी चार गुण होतील आणि निकाल रनरेटवर लागेल, जिथे भारत सध्या पिछाडीवर आहे.
विशेष म्हणजे, टीम इंडियाचा पुढचा सामना २६ फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वे विरुद्ध सायंकाळी ७ वाजता होणार आहे. मात्र, त्याच दिवशी दुपारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात महत्त्वाची लढत होणार आहे. म्हणजेच २६ फेब्रुवारीची तारीख भारतीय संघासाठी अत्यंत कळीची ठरेल. भारतीय संघ मैदानात उतरण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्याचा निकाल स्पष्ट झालेला असेल, ज्यामुळे भारताला आपली रणनीती अधिक अचूकपणे आखता येईल.