स्पोर्ट्स

Team India New Test Captain Announcement : भारताचा नवा कसोटी कर्णधार ठरला! आगरकर-गंभीर यांची मोहोर, ‘या’ तारखेला BCCI करणार घोषणा

रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर BCCI या फॉरमॅटसाठी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. आता असे दिसते की शोध संपला असून लवकरच याची घोषणा होईल.

रणजित गायकवाड

team india new test captain bcci gautam gambhir ajit agarkar confirmed

मुंबई : टीम इंडियाला पुढील महिन्यात जूनमध्ये इंग्लंडचा दौरा करायचा आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. दरम्यान, रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यापासून नवीन कर्णधाराचा शोध सुरू आहे. पण आता बीसीसीआयचा हा शोध संपला आहे आणि टीम इंडियाला एक नवीन कसोटी कर्णधार मिळाला आहे.

वृत्तानुसार, शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा नवा कसोटी कर्णधार बनवले जाऊ शकते. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. बीसीसीआय 23 किंवा 24 मे रोजी याबाबत अधिकृत घोषणा करू शकते.

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, निवड समितीची बैठक त्याच दिवशी मुंबईत होईल. इंग्लंड दौऱ्यावर गिल भारतीय संघाचा कर्णधार असेल हे निश्चित झाले आहे. त्याच दिवशी इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांसाठी संघाची निवडही केली जाईल.

इंग्लंड दौऱ्यावर गिल पहिल्यांदाच कसोटी संघाचे नेतृत्व करेल. पुढील विश्वचषक स्पर्धेत गंभीर आणि गिलची जोडी भारतीय संघाला किती पुढे घेऊन जाते हे निश्चितच पाहावे लागेल. माजी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा वारसा पुढे नेण्यासाठी गिलवर दबाव असेल.

कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणार का?

कर्णधारपदाव्यतिरिक्त, विराट कोहलीच्या संघातील उपस्थितीबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारी (दि. 9) एक बातमी समोर आली की रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्याने बीसीसीआयलाही याबद्दल माहिती दिली आहे. तथापि, बोर्डाने त्याला या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. संघ जाहीर करण्यापूर्वी, निवड समिती पुन्हा एकदा या मुद्द्यावर कोहलीशी चर्चा करेल आणि त्यानंतरच कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणार की नाही हे ठरवले जाईल.

कोहली निवृत्त झाला तर संघाला उणीव भासणार?

जर कोहलीने आपला निर्णय बदलला नाही आणि तो निवृत्तीवर ठाम राहिला तर भारतीय संघाच्या मधल्या फळीत पोकळी निर्माण होईल. या परिस्थितीत, संघाला अनुभवाची कमतरता जाणवू शकते. निवडकर्त्यांसाठी ही चिंतेची बाब असू शकते. अनुभव कमी असणा-या फलंदाजांना मधल्या फळीत खेळावे लागेल. केएल राहुल, गिल आणि यशस्वी जैस्वाल हे वरच्या फळीत खेळतील, तर ऋषभ पंत खालच्या फळीत खेळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT