मुंबई : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या थरारात भारतीय संघाने आपली विजयी घौडदौड कायम राखत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. या दिमाखदार विजयासह भारताने 'सुपर-८' फेरीतील आपले स्थान अधिकृतपणे निश्चित केले आहे. साखळी फेरीतील भारताचा अखेरचा सामना १८ फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध होणार असून, तांत्रिकदृष्ट्या हा सामना आता केवळ औपचारिकता उरली आहे. असे असले तरी, विजयाची लय कायम राखण्याचा ‘सूर्या’सेनेचा मानस आहे.
दरम्यान, 'सुपर-८' फेरीत भारताचा सामना कोणत्या बलाढ्य संघांशी होणार आणि हे सामने कधी व कुठे खेळवले जाणार, याचे सविस्तर वेळापत्रक आता समोर आले आहे.
१. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (अहमदाबाद)
'सुपर-८' फेरीतील भारताची पहिली लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. 'गट-ड' मध्ये दक्षिण आफ्रिकेने सलग ३ सामने जिंकून दिमाखात पुढची फेरी गाठली आहे.
२. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया/झिम्बाब्वे (चेन्नई)
दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया चेन्नईच्या ऐतिहासिक एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर उतरेल. 'प्री-सीडिंग'नुसार हा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, २६ फेब्रुवारीला होणाऱ्या या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची जागा अद्याप पक्की नाही. सध्या कांगारूंच्या संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. जर ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले आणि त्यांच्या जागी झिम्बाब्वे पात्र ठरले, तर भारताला झिम्बाब्वेचा सामना करावा लागेल.
३. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (कोलकाता)
'सुपर-८' फेरीतील भारताचा अखेरचा मुकाबला यजमान वेस्ट इंडिजशी होईल. १ मार्च रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर हा थरार रंगणार आहे.
आयसीसीने स्पर्धेपूर्वीच ‘सुपर-८’ फेरीसाठी संघांचे सीडिंग निश्चित केले होते. यानुसार, 'एक्स' (X) गटात भारताला X1, ऑस्ट्रेलियाला X2, वेस्ट इंडिजला X3 आणि दक्षिण आफ्रिकेला X4 असे सीडिंग दिले आहे. तर 'वाय' (Y) गटात इंग्लंडला Y1, न्यूझीलंडला Y2, पाकिस्तानला Y3 आणि श्रीलंकेला Y4 सीडिंग देण्यात आले आहे.
भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी आपल्या मानांकनानुसार 'सुपर-८' साठी पात्रता मिळवली आहे. साखळी फेरीतील गुणतालिकेत संघ पहिल्या स्थानी असो वा दुसऱ्या, त्यांच्या 'सुपर-८' मधील गटात बदल होणार नाही. मात्र, एखादा मानांकित संघ पात्र ठरू शकला नाही, तर त्याच्या जागी येणारा नवा संघ त्याच सीडिंगवर गृहीत धरला जातो.
विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर सध्या टांगती तलवार आहे. त्यांना ‘सुपर-८’ मध्ये स्थान मिळवण्यासाठी उरलेले दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील; अन्यथा ऑस्ट्रेलियाच्या जागी झिम्बाब्वेचा संघ भारताच्या गटात सामील होऊ शकतो.
सेमीफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी भारताला 'सुपर-८' मधील आपल्या गटात अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवणे अनिवार्य आहे. यासाठी भारताला किमान दोन सामने जिंकणे आवश्यक ठरेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची आकडेवारी पाहता, टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जात आहे. भारतीय चाहत्यांचे लक्ष आता या 'सुपर-८' मधील महामुकाबल्यांकडे लागले आहे.