मुंबई : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने इशान किशनच्या संघनिवडीबाबत भाष्य करताना अनेक महत्त्वपूर्ण पैलू उलगडले आहेत. जितेश शर्माच्या जागी इशानची निवड करणे हा निर्णय वैयक्तिकरित्या अस्वस्थ करणारा होता, कारण जितेश गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने संघाचा भाग होता, असे सूर्याने नमूद केले.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सूर्यकुमारला विचारण्यात आले की, इशान किशनवर दाखवलेला विश्वास हा केवळ आकडेवारीवर आधारित होता की मनाचा कौल? यावर उत्तर देताना सूर्या म्हणाला, ‘‘हा निर्णय घेताना इशानच्या आकडेवारीवर माझ्या मनाचा कौल भारी पडला. काही प्रमाणात आकडेवारीचा वाटा होता मी नाकारत नाही. पण दुसरीकडे जितेश शर्मासाठी ही बाब नक्कीच क्लेशदायक होती, कारण तो दीड वर्षांपासून संघासोबत होता आणि प्रत्यक्ष मैदानात खेळतही होता. जर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नसता, तर परिस्थिती कदाचित वेगळी असती.’’
सूर्यकुमार पुढे म्हणाला, ‘जितेश शर्माला डावलून इशान किशनची निवड करताना माझ्या मनात काहीशी अस्वस्थता होती. परंतु, जर आम्हाला अव्वल फळीत आक्रमकता हवी होती आणि सलामीला 'डाव्या-उजव्या' फलंदाजांचे कॉम्बिनेशन साधायचे होते, तर हा कठोर निर्णय घेणे भाग होते. मी इशानला फोन करून फक्त इतकेच विचारले की, ‘‘छोटू, विश्वचषक जिंकून देणार का?; त्यावर त्यानेही अत्यंत आत्मविश्वासाने 'फक्त माझ्यावर विश्वास ठेवा', असे उत्तर दिले. त्यानंतर मी इशानच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेतला.’’
इशानच्या कामगिरीचे कौतुक करताना सूर्या म्हणाला, ‘‘निवडीनंतर इशानने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती थक्क करणारी होती. न्यूझीलंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत त्याने ज्या प्रकारे सुरुवात केली, त्यावरून तो संघात 'एक्स फॅक्टर' ठरेल याची मला खात्री होती. संघातून बाहेर असताना तो घरी गेला आणि खूप निराश होता. मात्र, त्याने स्वतःच्या खेळाचे विश्लेषण केले आणि पुन्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने सराव सामन्यांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला. त्याचा हा संघर्ष आणि त्यानंतर त्याने केलेले प्रदर्शन पाहता, तो भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी पूर्णपणे पात्र होता.’’