India Vs Zimbabwe Suryakumar Yadav: चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या भारत विरूद्ध झिम्बाब्वे सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळं भारताचं सेमी फायनल गाठण्याचं आव्हान कायम राहिलं आहे. मात्र असं असलं तरी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मात्र आपल्या संघाच्या कामगिरीवर खूश नाहीये. झिम्बाब्वेविरूद्धचा विजय महत्वाचा असला तरी नॉक आऊट स्टेजपूर्वी संघाला अजून क्लिनिकल होणं गरजेचं असल्याचं मत त्यानं व्यक्त केलं.
गुरूवारी झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. भारताने २० षटकात ४ बाद २५६ धावा केल्या. सुपर ८ मध्ये दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागलेल्या टीम इंडियानं जोरदार पुनरागमन केलं.
मात्र असं असलं तरी धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वे कधीही विजयाच्या जवळ आहे असं वाटलं नाही. मात्र तरी देखील त्यांनी २० षटकात ६ बाद १८४ धावा करत भारतीय गोलंदाजांची चांगलीच परीक्षा पाहिली. सहावा गोलंदाज शिवम दुबेने दोन षटकातच ४६ धावा दिल्या. यामुळं भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा चिंतेत आहे.
सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, 'आम्ही गोलंदाजीत अजून चांगली कामगिरी करू शकलो असतो. विजय हा विजय असतो मात्र आम्हाला आमच्या पर्यायांसोबत थोडं स्मार्ट व्हावं लागेल. वेस्ट इंडीज विरूद्धच्या सामन्यात आम्ही आमची चूक सुधारू.
भारताचा पुढचा सामना हा १ मार्च रोजी कोलकाता इथं इंडन गार्डनवर होत आहे. वेस्ट इंडीजविरूद्धचा हा सामना या स्पर्धेतील एक क्वार्टर फायनल सामना म्हणून गणला जात आहे.
कर्णधार सूर्यकुमारने भारतीय संघाने या सामन्यात आपल्या जुन्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला. आम्ही लीग स्टेज आणि गेल्या सामन्याबद्दल फार विचार केला नाही. आमच्या व्हिडिओ एनलिस्टने गेल्या एका वर्षातील सकारात्मक कामगिरीचे प्रेझेंटेशन तयार केलं होतं. त्यामुळं आम्हाला आत्मविश्वास मिळाला. त्यामुळं आम्ही पूर्ण स्पष्टतेनं मैदानात उतरलो.
सूर्यानं फलंदाजांचे कौतुक करत टॉप ऑर्डरपासून नंबर ७ पर्यंतच्या प्रत्येक फलंदाजाने योगदान दिलं आणि फलंदाजीत कामगिरी जवळपास परिपूर्ण राहिली.