Sunil Gavaskar on Ajinkya Rahane Pudhari
स्पोर्ट्स

Sunil Gavaskar : 'अजिंक्य रहाणेला जे मिळायला हवे होते...': सुनील गावस्‍कारांनी मांडले कटू वास्तव

अजिंक्‍य राहणेची केली भारतीय दिग्गज खेळाडूशी केली तुलना

पुढारी वृत्तसेवा

Sunil Gavaskar on Ajinkya Rahane : ३८ वर्षीय फलंदाज अजिंक्य रहाणेने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. सुमारे तीन वर्ष तो भारतीय संघातून बाहेर होता. भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी रहाणेचे भरभरून कौतुक केले आहे. रहाणे ज्या कौतुकास व श्रेयाचा खरोखर हकदार होता, ते त्याला कधी मिळालेच नाही, असे गावस्कर म्हणाले. तसेच त्यांनी रहाणेची तुलना भारताचे दिग्गज खेळाडूशी केली.

अजिंक्‍यचे सर्वात मोठे यश 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी'तील विजय

रहाणेने २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर ८५ कसोटी, ९० वनडे आणि २० टी-२० सामने खेळले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३८.४६ च्या सरासरीने ५,०७७ धावा केल्या, ज्यामध्ये १२ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. रहाणेचे सर्वात मोठे यश म्हणजे २०२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी'चा विजय! नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, प्रमुख खेळाडूंविना मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचे रहाणेने यशस्वी नेतृत्व केले आणि ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव करत मालिका जिंकून दिली.

गावस्करांनी मांडले कडू सत्य

'मिड-डे'मधील आपल्या कॉलममध्ये गावस्कर यांनी लिहिले, "कर्णधार म्हणून रहाणेची नोंद अत्यंत उत्तम आहे. त्याने सहा कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले, ज्यापैकी चार सामने जिंकले आणि एकही सामना गमावला नाही; तर दोन सामने अनिर्णित (ड्रॉ) राहिले. राहुल द्रविडनेही आपल्या कर्णधारपदात काही उत्कृष्ट विजय मिळवले, पण त्यालाही ते श्रेय मिळाले नाही ज्याचा तो हकदार होता. रहाणेच्या नेतृत्वाचेही जितके कौतुक व्हायला हवे होते, तितके झाले नाही.भारतीय क्रिकेटमध्ये हे असेच घडते. जेव्हा संघ जिंकतो, तेव्हा सर्व कौतुक वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे होते; मग तो फलंदाज असो वा गोलंदाज. मात्र, जेव्हा संघ हरतो, तेव्हा सर्व दोष कर्णधार आणि प्रशिक्षकावर ढकलला जातो."

कठीण परिस्थितीत झळकावले होते शतक

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ॲडलेड येथील पहिली कसोटी अत्यंत लाजीरवाण्या पद्धतीने गमावल्यानंतर कोहली पितृत्व रजेवर भारतात परतला होता. ॲडलेडमध्ये भारतीय संघ दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांत गारद झाला होता. त्यानंतर रहाणेने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीतही मालिका जिंकून दाखवली. दुसऱ्या कसोटीत रहाणेने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा जिद्दीने सामना करत २२३ चेंडूंत ११२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी उभारली होती.

'रहाणेने बुडणारे जहाज सावरले'

गावस्कर यांनी पुढे लिहिले, "ऑस्ट्रेलियात २०२१ च्या मालिकेत पहिल्या कसोटीत ३६ धावांत ऑलआऊट झाल्यानंतर रहाणेने माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत मिळून संघाला सावरले. उपकर्णधाराने बुडण्याच्या मार्गावर असलेल्या जहाजाची कमान हाती घेतली आणि त्याला केवळ सुरक्षित किनाऱ्यावरच आणले नाही, तर ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या 'द गाबा'वर भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मालिकेतला हा शेवटचा कसोटी सामना होता, जेव्हा अनेक महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे बाहेर होते, तेव्हा भारताने कसोटी क्रिकेटमधील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला. रहाणे आज स्वाभिमानाने निवृत्त होत आहे आणि कोणताही स्वार्थ न ठेवता क्रिकेट खेळल्याबद्दल सर्व क्रिकेटप्रेमी मनापासून त्याचे आभार मानत आहेत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT