Sunil Gavaskar on Vaibhav Sooryavanshi : भारतीय क्रिकेटमधील नवा वंडरबॉय वैभव सूर्यवंशीचे टीम इंडियात पदार्पण कधी होणार? या एका प्रश्नाची सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. आयर्लंड दौऱ्यात वैभवला संधी मिळाली नाही. यांनतर १५ वर्षांच्या या युवा खेळाडूला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यातही संघात स्थान मिळाले नाही. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आता वैभव सूर्यवंशीबाबत चिंतेत आहेत. याबाबत त्यांनी आपले मत स्पष्ट केले आहे.
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये झंझावाती फलंदाजी करून निवडकर्त्यांना त्याला टी२० आंतरराष्ट्रीय संघात निवडण्यास भाग पाडले होते. मात्र, नवीन कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांची जोडी त्याला अद्याप पदार्पणाची संधी देत नाहीये.
सुनील गावस्कर यांनी 'सोनी स्पोर्ट्स'वर बोलताना सांगितले की," वैभव सूर्यवंशीला जेव्हा कधी संधी मिळेल, तेव्हा तो अधिक दबावाखाली असेल. पण १५ वर्षे वय असताना तुम्ही दबावाचा फारसा विचार करत नाही. त्याला हे ठाऊक आहे की, त्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली, तर त्याला लगेचच चांगली कामगिरी करावी लागेल. बस एवढीच गोष्ट आहे. पण तो इथे (भारतीय संघात) राहून आनंदी आहे. हा भारतीय संघ दिग्गज आणि उत्कृष्ट खेळाडूंनी भरलेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून शिकणे त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल."
संजू सॅमसन सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आता भव सूर्यवंशीचे पदार्पण आता फार दूर नाही असेच दिसतेय. सॅमसनला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या गेल्या तीन टी२० सामन्यांमध्ये एकदाही १० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. आयर्लंडविरुद्ध तो अनुक्रमे ५ आणि ० धावा करून बाद झाला होता, तर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात त्याने ७ चेंडूत अवघ्या १ धाव केली. सॅमसन खराब फॉर्ममधून जात आहे, ते पाहता संघ व्यवस्थापनाला या टी२० विश्वविजेत्या खेळाडूला संघातून डच्चू देण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागू शकतो. सॅमसनला बाहेर बसवल्यास अभिषेक शर्माला वैभव सूर्यवंशीच्या रूपाने एक नवा सलामीचा जोडीदार मिळेल.