Shreyas Iyer ENG vs IND pudhari
स्पोर्ट्स

Shreyas Iyer ENG vs IND: वाईट खेळलो; ही २०० धावांची खेळपट्टी नव्हती... कर्णधार श्रेयसनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

Anirudha Sankpal

Shreyas Iyer On ENG vs IND 3rd T20I Defeat: इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद २०१ धावा केल्या होत्या. मात्र भारताचा डाव अवघ्या ७६ धावात संपुष्टात आला. इंग्लंडने हा सामना १२५ धावांनी जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

भारताच्या या मोठ्या पराभवानंतर टी २० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवाची कारणे सांगितली. श्रेयस अय्यर म्हणाला की, 'मला वाटतं की आम्ही खराब क्रिकेट खेळलो. याच्यापेक्षा चांगले शब्द मी वापरू शकत नाही. एवढ्या मार्जिनने पराभव होणे हे कदापी मान्य नाही. मला वाटतं की आम्हाला पराभव स्विकार करून बेसिक्सवर पुन्हा जावं लागेल. आम्ही काय चुका केल्या याचा आढावा घ्यावा लागेल.'

खेळपट्टीबाबत बोलताना श्रेयस म्हणाला की, 'मला वाटते की ही खेळपट्टी २०० धावा करण्यासारखी नव्हती. त्याचबरोबर आम्ही पॉवर प्लेमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली. आम्ही चार विकेट्स गमावल्या तिथंच आम्ही पराभूत झालो.'

अय्यर पुढे म्हणाला, 'मला वाटतं की तुम्ही टीम मिटिंगमध्ये काही प्लॅन करू शकता. मात्र ज्यावेळी तुम्ही मैदानावर येता त्यावेळी तुम्हाला त्वरित अॅडजस्ट करावं लागतं. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्याला कोणत्या लेंथवर गोलंदाजी करायची आहे. खेळट्टी हार्ड लेंथ गोलंदाजीला मदत करत होती. आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. ज्यावेळी तुम्हाला २०० धावांचा पाठलाग करायचा आहे त्यावेली तुम्हाला वेगवान खेळी करावी लागते. मात्र आम्हाला ते करता आलं नाही.'

सलग दोन पराभवानंतर आता भारताला मालिका जिंकता येणार नाहीये. पहिला सामना हा पावसामुळं रद्द झाला होता. त्यामुळं आता उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवून भारताला मालिका बरोबरीत करावी लागणार आहे. याबाबत बोलताना अय्यर म्हणाला की, 'आमच्याकडे स्ट्राँग कमबॅक करण्याची संधी आहे. यापूर्वी जे काही झालं त्याबाबत आम्हाला जास्त विचार न करता. जे काही खराब खेळलो त्यातून शिकवण घेत त्या चुका टाळव्या लागतील.'

भारताचा पुढचा चौथा टी २० सामना हा ९ जुलै रोजी ब्रिस्टल इथं होणार आहे. तर मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना हा ११ जुलै रोजी साऊथहेम्प्टनला होणार आहे. ९ जुलैचा सामना हा रात्री १० वाजता सुरू होणार आहे तर साऊथहॅम्प्टनचा सामना हा भारतीय वेळेनुसार रात्री ७ वाजता सुरू होईल. यानंतर भारतीय संघ ३ वनडे सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT