Shreyas Iyer, India's Next T20 Captain: भारतीय टी-20 संघाच्या नेतृत्वाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यरची टीम इंडियाच्या पुढील टी-20 कर्णधारपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बीसीसीआयच्या एपेक्स कौन्सिलच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. तसे झाल्यास सूर्यकुमार यादवच्या जागी अय्यर भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी होणाऱ्या ऑनलाइन बैठकीत श्रेयस अय्यरच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर इतर निवड समिती सदस्यांना याबाबत माहिती देतील. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाची निवड 6 जून रोजी होणार असून, त्या संघाचे नेतृत्व अय्यरकडे सोपवले जाऊ शकते.
दरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संजू सॅमसनला टी-20 कर्णधार बनवण्याच्या बाजूने असल्याची चर्चा होती. मात्र, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी त्या मताशी सहमती दर्शवली नसल्याचे वृत्त आहे. अखेरीस श्रेयस अय्यरच्या नावावर एकमत झाल्याचे सांगितले जात आहे.
फक्त कर्णधारपदच नाही, तर उपकर्णधारपदाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. तिलक वर्माकडे भारतीय टी-20 संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तसे झाल्यास तो अक्षर पटेलची जागा घेईल.
दरम्यान, आयपीएलमध्ये सलग दोन वेळा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजेतेपद मिळवून देणारा रजत पाटीदार हा देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा होती. मात्र, सध्याच्या घडीला बीसीसीआयने त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचे वृत्त आहे.
श्रेयस अय्यरने आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सला अंतिम फेरीपर्यंत नेले होते. त्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचेही त्याने प्रभावी नेतृत्व केले. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावले होते.
यामुळे भारतीय टी-20 संघाच्या पुढील नेतृत्वासाठी श्रेयस अय्यर हा सर्वात मजबूत दावेदार मानला जात होता. आता बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा होते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.