Shreyas Iyer BCCI plans: बीसीसीआयने भारतीय टी २० संघात काही मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आता सूर्यकुमार यादवला डच्चू देण्याचा निश्चय केला आहे. तो सध्या भारतीय टी २० संघाचा कर्णधार आहे. त्याने २०२४ च्या टी २० वर्ल्डकपनंतर संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र फलंदाजीत त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी २० वर्ल्डकप जिंकला मात्र त्याला फलंदाजीत आपलं योगदान देता आलेलं नाही. बीसीसीआय आता सूर्यकुमार यादवचा पर्याय म्हणून श्रेयस अय्यरकडे पहात आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयला आता सूर्यापासून सुटका हवी आहे. त्यांना आता सूर्याच्या बॅड फॉर्मचं ओझं वहायचं नाहीये. दुसरीकडे श्रेयस अय्यरने फलंदाजीत आणि कर्णधार म्हणून देखील उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. आता सर्वांना माहिती आहे की अय्यर सूर्याची जागा घेणार आहे. आता पुढचा टी २० वर्ल्डकप हा २०२८ मध्ये होणार आहे. तसेच अमेरिकेत ऑलिम्पिक गेम्स देखील होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघाच्या नेतृत्वात खांदेपालट होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक दोन वर्षांनी टी २० वर्ल्डकप येतो. त्यामुळं बीसीसीआय दोन वर्षाचे प्लॅनिंग करत असते. भारताने २०२२ च्या टी २० वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमधून गाशा गुंडाळला होता. त्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्व आलं त्यावेळी त्याला त्याच्याकडे दोन वर्षे आहेत हे माहिती होतं. त्याने २०२४ पर्यंत संघाचे नेतृत्व केलं. त्यानंतर तो थांबला, मग बीसीसीआयने सूर्याला निवडलं. हा निर्णय रोहितशी चर्चा करून घेण्यात आला.
त्यानंतर सूर्या आणि गौतम गंभीरने २०२६ च्या टी २० वर्ल्डकपचं प्लॅनिंग केलं अन् तो जिंकला देखील. मात्र सूर्याचा फलंदाजीमधील फॉर्म खालावला. २०२५ मध्ये संपूर्ण वर्षात त्य्ला एकदाही अर्धशतकी खेळी करता आलेली नाही. सूर्या संघावर बोज होत होता. मात्र त्याने टी २० वर्ल्डकप २०२६ मध्ये धमाकेदार कामगिरी करत युएसएविरूद्ध ८४ धावांची नाबाद खेळी केली. मात्र त्यानंतर पुन्हा त्याची बॅट शांत झाली.
सूर्याने कधी मस्ट विन गेममध्ये धावा केल्या नाहीत असा एक आरोप त्याच्यावर होतो. या वर्षी झालेल्या वर्ल्डकपमध्ये नॉक आऊट सामन्यात भारताच्या कर्णधाराने १८, ११ आणि ० धावा केल्या.