Sanju Samson Helmet Controversy ICC Action: टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत भारताने वेस्ट इंडिजवर थरारक विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात भारतासमोर १९६ धावांचे लक्ष्य होते. दबावाच्या परिस्थितीत संजू सॅमसनने जबरदस्त खेळी करत भारताला चार चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवून दिला. मात्र या विजयानंतरचा त्याचा जल्लोष आता चर्चेचा विषय ठरत आहे.
संजू सॅमसनने ५० चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या. त्याच्या खेळीत १२ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. लक्ष्याचा पाठलाग करताना तो शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि विजयी चौकार मारताच त्याच्या भावनांचा बांध फुटला.
विजय झाल्यानंतर संजूने हेल्मेट हवेत फेकले आणि आकाशाकडे हात उंचावत आनंद व्यक्त केला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भावनिक प्रतिक्रिया स्पष्ट दिसत होती.
या विजयासह भारताने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. आता ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत.
संजूचा जल्लोष सोशल मीडियावर व्हायरल झाला, पण त्याच वेळी प्रश्नही उपस्थित झाला की, मैदानावर हेल्मेट फेकणे आचारसंहितेचे उल्लंघन तर नाही ना?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) खेळाडूंच्या वर्तनाबाबत अत्यंत कडक नियम तयार केले आहेत. मैदानावर हेल्मेट किंवा बॅट फेकणे हे "खेळाडूचे चुकीचे वर्तन" (unsporting conduct) या श्रेणीत येऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये दंड, डिमेरिट पॉइंट्स किंवा गरज पडल्यास निलंबनाची कारवाईही होऊ शकते.
ICC च्या आचारसंहितेचा मुख्य उद्देश केवळ शिस्त राखणे नाही, तर मैदानावरील इतर खेळाडू, पंच आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा करणे हा आहे. हेल्मेट फेकताना अनवधानाने कोणाला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संजूचा हा जल्लोष पाहून अनेकांना IPL 2023 मधील आवेश खानची घटना आठवली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर एका धावांनी विजय मिळवल्यानंतर आवेशनेही हेल्मेट जमिनीवर आपटले होते. त्या वेळी त्याला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवून तंबी देण्यात आली होती. म्हणूनच आता प्रश्न उपस्थित होत आहे की, संजूवरही अशीच कारवाई होणार का?
क्रिकेटमध्ये भावनांना महत्त्व असले तरी संयम ठेवणे महत्त्वाचे असते. मोठ्या स्पर्धेतील ताण, टीका आणि अपेक्षांचा भार यामुळे खेळाडू भावनिक होणे स्वाभाविक आहे. मात्र नियम सर्वांसाठी समान असतात. सध्या मात्र चर्चेचा केंद्रबिंदू संजूची खेळी आहे. त्याने आपल्या बॅटने टीकाकारांना उत्तर दिले आहे. संघ जिंकला, देश आनंदात आहे. आता सर्वांचे लक्ष ICC च्या निर्णयाकडे लागले आहे.