Sakshi Dhoni Viral Video: टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ धावांनी थरारक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या रोमांचक सामन्याच्या शेवटच्या क्षणात मैदानावर एक असा मजेदार प्रसंग घडला, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी मुंबईतील Wankhede Stadium येथे हा सामना पाहण्यासाठी आले होते. सामन्याच्या शेवटच्या षटकांदरम्यान साक्षी धोनीने दिलेल्या उत्साही प्रतिक्रियेनंतर धोनीचा शांत, विनोदी अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
इंग्लंडसमोर भारताने २५४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते आणि इंग्लिश संघ या लक्ष्याचा पाठलाग करत होता. सामना अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असताना १८व्या षटकात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. त्याच वेळी इंग्लंडचा फलंदाज सॅम करणने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू थेट बुमराहकडे गेला आणि त्याने झेप घेत तो पकडला. सुरुवातीला अनेकांना वाटले की कॅच घेतला आहे आणि विकेट पडली आहे.
मात्र प्रत्यक्षात चेंडू आधी जमिनीला लागला होता. त्यामुळे तो ‘बंप बॉल’ होता आणि विकेटही मिळाली नाही. पण प्रेक्षकांमध्ये बसलेल्या साक्षी धोनीने त्या क्षणी उत्साहात उभा राहून आनंदाने उड्या मारल्या. साक्षीला असे वाटले की इंग्लंडचा आणखी एक फलंदाज बाद झाला आहे.
हा प्रसंग पाहून शेजारी असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आपल्या नेहमीच्या शांत आणि कूल अंदाजात प्रतिक्रिया दिली. त्याने हाताने इशारा करत साक्षीला सांगितले की विकेट पडलेली नाही. धोनीचा हा हलकाफुलका अंदाज पाहून आजूबाजूचे लोक हसू लागले. स्वतः धोनीही हा प्रसंग पाहून हसू लागला.
या मजेदार क्षणाचा व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहत्यांनी याला ‘क्यूट मोमेंट’ असे म्हणले आहे. क्रिकेटमधील तणावपूर्ण वातावरणात असा हलकाफुलका क्षण पाहायला मिळाल्याने अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत धोनी आणि साक्षीच्या या केमिस्ट्रीचे कौतुक केले.
दरम्यान, सामना अत्यंत रोमांचक झाला. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २५३ धावा केल्या. भारतीय संघाकडून संजू सॅमसनने शानदार ८९ धावांची खेळी केली, तर शिवम दुबेने ४३ धावा केल्या. या जोरावर भारताने इंग्लंडसमोर २५४ धावांचे आव्हान उभे केले.
इंग्लंडकडून जेकब बेथेलने दमदार १०५ धावांची खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहने अचूक गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना धावा करू दिल्या नाहीत. त्याच्या प्रभावी डेथ ओव्हर गोलंदाजीमुळे भारताने सामना ७ धावांनी जिंकला.
या विजयासह भारताने ICC Men's T20 World Cup 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता ८ मार्च रोजी अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड सोबत होणार आहे. या सामन्यात भारताचे लक्ष्य तिसऱ्या टी-२० विश्वचषक विजेतेपदावर असेल.