पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली या दोघांनी T20 विश्वचषक असो किंवा 50 षटकांचा विश्वचषक असो. आपली क्षमता सिद्ध करून दाखविली आहे. या दोघांमध्ये अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी येत आहे, ऑस्ट्रेलियात मोठी कसोटी मालिका होणार आहे. तेथेही ते आपल्या कामागिरीने प्रेरित होतील आणि जर त्यांनी तंदुरुस्ती राखली. तर ते 2027 चा विश्वचषक खेळू शकतात, असे भाकित टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आज (दि.२२) केले आहे.
श्रीलंका दौऱ्यातून गंभीर प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करत आहे. या दौऱ्याने गौतम गंभीर यांचा कार्यकाळ सुरू होत आहे. श्रीलंका दौरा सुरू होण्यापूर्वी गंभीर यांनी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.
रोहित-विराट यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबाबत गंभीर म्हणाला की, 'हा अत्यंत वैयक्तिक निर्णय आहे. त्याच्यात किती क्रिकेट शिल्लक आहे, हे मी सांगू शकत नाही. विराट आणि रोहितने जे काही केले ते पाहता ते अजूनही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. त्याच्यात अजून बरेच क्रिकेट शिल्लक आहे. कोहलीसोबत माझे खूप चांगले संबंध आहेत, तो एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि माझ्या मनात एकमेकांबद्दल खूप आदर आहे.
गंभीर पुढे म्हणाला की, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळाडू मला नेहमीच साथ देतील. ड्रेसिंग रूममध्ये आनंदी वातावरण असणे महत्त्वाचे आहे. मी एका अतिशय यशस्वी संघाचे नेतृत्व करत आहे.
जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूसाठी वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचे आहे. रोहित आणि विराट टी-20 खेळत नाहीत, त्यामुळे त्यांना बहुतांश महत्त्वाच्या सामन्यांसाठी उपलब्ध राहावे लागेल. एखाद्या फलंदाजासाठी, जर तो चांगले क्रिकेट खेळू शकतो आणि चांगल्या फॉर्ममध्ये असेल. तर त्याने सर्व सामने खेळले पाहिजेत. केवळ जसप्रीत बुमराहसाठीच नाही. तर बहुतांश गोलंदाजांसाठी वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचे आहे. फलंदाजांपेक्षा गोलंदाजांना विश्रांतीची जास्त गरज असते, असे गंभीर म्हणाला.
टीम इंडिया 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा पूर्वीप्रमाणेच वनडे संघाची धुरा सांभाळणार आहे. दोन्ही मालिकेत उपकर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे आहे.