Rohit Sharma MI Captaincy: आयपीएल २०२६ च्या हंगामात मुंबई इंडियन्सला ग्रुप स्टेजमधील त्यांच्या १४ पैकी फक्त ४ सामन्यातच विजय मिळवता आला आहे. यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्याच्या फॉर्म आणि कॅप्टन्सीबाबत देखील खूप चर्चा झाली आहे. संघाकडून हार्दिकला सपोर्ट मिळत नसल्याचे अनेक जाणकारांचे निरीक्षण राहिले आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्स सोडू शकतो असं चित्र निर्माण झालं आहे. सूत्रांकडूनही अशाच प्रकारची माहिती मिळत आहे.
हार्दिकच नाही तर मुंबई इंडियन्सचे संघ व्यवस्थापन देखील हार्दिक पांड्याला सोडून दुसरा विचार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२४ मध्ये मुंबईने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करत थेट कर्णधार केलं होतं. मात्र हा निर्णय यशस्वी ठरला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटमध्ये मोठा खल सुरू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर तोच विराजमान होईल ज्याच्या डोक्यावर रोहित शर्माचा हात असेल. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माला काढून हार्दिककडे सूत्रे सोपवण्याच्या घटनेवरून धडा घेतला आहे. अशाच प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता संघ व्यवस्थापन काळजी घेत आहे. मुंबई इंडियन्स संघात रोहित शर्मा हे सर्वात मोठे नाव आहे. तो आता संघाचा पुढचा कर्णधार निवडण्यामध्ये मोठी भूमिका निभावणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत बोलायचं झालं तर ते पुन्हा रोहित शर्माकडे जाण्याची शक्यता नाही हे मात्र निश्चित आहे.
सूत्रांनी सांगितलं की, 'मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार तोच असेल त्याला रोहित शर्माचा आशीर्वाद प्राप्त झाला असेल. मुंबईला त्यांची चूक समजली आहे. मात्र रोहित पुन्हा कर्णधार होणार नाही.'
मुंबई इंडियन्स मॅनेजमेंट हार्दिक पांड्याचं पुढं काय करायचं याबाबत जरी १०० टक्के शाश्वत नसली तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३२ वर्षाचा पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्याचे संघ व्यवस्थापनासोबत चांगले नाते राहिलेले नाही त्यामुळं हार्दिक एमआयमध्ये काही दिवसांचाच पाहुणा असू शकतो
'हार्दिक पांड्या ट्रान्सफरसाठी प्रयत्न करेल. हे फक्त कर्णधारपदाबाबत नाही तर वैयक्तिक नात्यांबाबत देखील आहे. ज्या मॅनेजमेंटसोबत तुमचे नाते चांगले नाही त्या कंपनीत तुम्ही काम करणार का?' असा सवाल जाणकारांनी केला आहे. हार्दिकबाबत काय करायचे याबाबतचा निर्णय येत्या काही आठवड्यात घेतला जाण्याची शक्यता आहे.