प्रतिकात्‍मक छायाचित्र.  Pudhari
स्पोर्ट्स

IPL 2026 | 'माझ्याकडे उत्तरं नाहीत... कोणतंही कारण नाही': लखनौच्या पराभवाच्या 'चौकारा'नंतर ऋषभ पंत नेमकं काय म्हणाला?

Rishabh Pant IPL 2026 : 160 धावांचं माफक लक्ष्य गाठताना लखनौचा संघ केवळ ११९ धावांवर गारद

पुढारी वृत्तसेवा

Rishabh Pant IPL 2026

लखनौ : टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत नेतृत्व करणार असलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी सुमार झाली आहे. लखनौने ऋषभ पंतला २७ कोटी रुपयांना खरेदी केले होते. तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरला. मात्र यंदा सलग चार पराभवांचा सामना केल्यानंतर ऋषभ पंत हतबल झाला असून, बुधवारी राजस्थानकडून पराभवानंतर आपल्याकडे पराभव का झाला याची उत्तरं नाहीत, असे नामुष्कीचे विधान करत त्याने आपली निराशा उघडपणे व्यक्त केली.

160 धावांचं माफक लक्ष्य गाठताना लखनौ केवळ ११९ धावांवर गारद

१६० धावांचं माफक लक्ष्य गाठताना, लखनौ सुपर जायंट्सचा संघ केवळ ११९ धावांवर गारद झाला. खेळपट्टीला चांगली हालचाल मिळत होती आणि राजस्थान रॉयल्सच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने त्यांना पराभूत केले. सलामीवीर मिशेल मार्शने ५५ धावा केल्या असल्या तरी त्याचा हा एकाकी प्रतिकार ठरला. गोलंदाज जौफ्रा आर्चरने ३ बळी टिपत लखनौच्या डावात खरा सुरुंग लावला. राजस्थानने लखनौला १८ षटकांत सर्वबाद ११९ धावांवर रोखले.

एक संघ म्हणून आम्ही निराश....

या नामुष्कीजनक पराभवानंतर बोलताना ऋषभ पंत म्हणाला की, माझ्याकडे उत्तरं नाहीत. फलंदाजीने आम्हाला निराश केले आहे. एक संघ म्हणून, एक गट म्हणून आम्ही निराश आहोत.

‘कोणतीही सबब नाही... माझ्या स्वतःसह’

कर्णधार ऋषभ पंत दोषारोप करण्याऐवजी आत्मपरीक्षणावर भर देत स्पष्ट केले की, "आता आम्हाला उत्तरे आत शोधावी लागतील, बाहेर नाही. फलंदाजी करताना आम्ही थोडा वेळ घेऊ शकलो असतो. कोणतीही सबब चालणार नाही. माझ्यासह सर्वांनीच आम्ही डाव आणखी पुढे नेऊ शकलो असतो. एक फलंदाजी गट म्हणून, आम्हाला आमची चूक मान्य करावी लागेल.

आम्हाला मान उंचावून आत्मपरीक्षणातूनच मार्ग शोधावा लागेल

पंतने कबूल केले की खेळपट्टीचा अंदाज घेणे ही एक मोठी भूमिका होती, कारण स्विंग आणि सीमसाठी अनुकूल परिस्थितीमुळे फटकेबाजी करणे कठीण झाले होते. या धक्क्यानंतरही, त्याने संघातील क्षमतेकडे लक्ष वेधून सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला पुढील सामन्याकडे सकारात्मक गोष्टींकडे पाहावे लागेल. आम्हाला आम्हाला मान उंचावून आत्मपरीक्षणातूनच मार्ग शोधावा लागेल. आमच्यात हंगामाला कलाटणी देण्याची क्षमता आहे, असा विश्‍वासही पंतने व्‍यक्‍त केला.

रवींद्र जडेजाची सामन्यात निर्णायक भूमिका

या सामन्यात रवींद्र जडेजाने नाबाद ४३ धावा करून निर्णायक भूमिका बजावली. अवघड खेळपट्टीवर राजस्थानच्या डावाला त्याने आकार दिला. तसेच सन्मानजनक धावांपर्यंत संघाला नेले. जडेजा म्हणाला की, खेळपट्टीमुळे निर्माण झालेले आव्हान त्याने मान्य केले आणि चेंडू सीम व स्विंग होत असल्याने शेवटपर्यंत फलंदाजी करणे महत्त्वाचे होते. त्याच्या विचारपूर्वक आखलेल्या रणनीतीमुळे एक स्पर्धात्मक धावसंख्या उभारली गेली, जी पुरेशी ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT