Rahul Dravid Superstar Culture: भारतीय क्रिकेटमधील ‘सुपरस्टार कल्चर'वर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडत, “प्रत्येक खेळाला स्वतःचे हिरो आणि सुपरस्टार लागतात” असं मत व्यक्त केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या विचारांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे.
गौतम गंभीर यांनी यापूर्वी अनेकदा संघात ‘सुपरस्टार कल्चर’ नसावं, टीम वैयक्तिक खेळाडूंपेक्षा मोठी असते, असं मत मांडलं आहे. मात्र राहुल द्रविड यांनी या चर्चेकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं आहे.
Wisden Scoop Podcast वर बोलताना राहुल द्रविड म्हणाले, “प्रत्येक खेळाला हिरो हवेत. भारतासारख्या देशात कुठलाही खेळाडू विनाकारण सुपरस्टार होत नाही. त्यामागे सातत्यपूर्ण कामगिरी असते.” त्यांच्या मते, उत्कृष्ट प्रदर्शनामुळेच खेळाडू चाहत्यांच्या अपेक्षा आणि भावनांचा भाग बनतात.
द्रविड यांनी भारतीय क्रिकेटच्या सुवर्णकाळाची आठवण करत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारख्या खेळाडूंचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, या खेळाडूंनी केवळ विक्रमच केले नाहीत, तर भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली.
राहुल द्रविड यांनी अलीकडच्या काळातील भारतीय संघाच्या टेस्ट क्रिकेटमधील कामगिरीवरही मत व्यक्त केलं. गौतम गंभीर यांच्या कार्यकाळात भारताला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर पराभव स्वीकारावा लागला होता. यावर बोलताना द्रविड म्हणाले की, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांसारख्या अनुभवी खेळाडूंची जागा भरणं सोपं नाही.
तरीही भारतीय क्रिकेटच्या भविष्यासंदर्भात त्यांनी आशावाद व्यक्त केला. “भारतीय संघ सर्व फॉरमॅटमध्ये स्पर्धात्मक राहील. थोडा वेळ लागू शकतो, पण टीम पुन्हा दमदार पुनरागमन करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासोबतच, सतत व्हाईट-बॉल क्रिकेट खेळल्यामुळे खेळाडूंना वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये पटकन जुळवून घेणं कठीण जात असल्याचंही द्रविड यांनी नमूद केलं. त्यांच्या मते, याचाही परिणाम टेस्ट क्रिकेटमधील कामगिरीवर होतो.