स्पोर्ट्स

Operation Sindoor IPL Match : ‘ऑपरेशन सिंदूर’चा IPL वर परिणाम! धर्मशाला विमानतळ बंद केल्याने ‘या’ सामन्यांवर संकट

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारताने हल्ले केल्यानंतर देशातील अनेक विमानतळ बंद केले आहेत. यामुळे IPL संघांसमोर प्रवासाचे मोठे संकट निर्माण झाले आहे.

रणजित गायकवाड

operation sindoor ipl 2025 match schedule

धर्मशाला : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. तेव्हापासून, देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील किमान 18 विमानतळ बंद करण्यात आले आहेत, ज्यात श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाला आणि जामनगर यांचा समावेश आहे.

...तर मुंबई-पंजाब सामना शिफ्ट होणार?

पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला विमानतळ सुरक्षेच्य कारणास्तव तात्पुरते बंद करण्यात आले आहे. परिणामी येथील क्रिकेट स्टेडियमावर खेळवण्यात येणा-या आयपीएल सामन्यादरम्यान संघांच्या प्रवास वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. गुरुवारी (दि. 8) धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) यांच्यात सामना खेळला जाणार आहे. यानंतर, 11 मे रोजी पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान, 11 मे रोजीची धर्मशाला येथे खेळला जाणारा एमआय विरुद्ध पंजाब यांच्यातील सामना आता मुंबईत शिफ्ट केला जाऊ शकतो.

धर्मशाला हे पंजाब किंग्ज संघाचे दुसरे होम ग्राउंड आहे. पंजाब संघाला सध्या प्रवासाशी संबंधित कोणतीही समस्या नाही कारण ते या आठवड्याच्या अखेरीपर्यंत तिथेच राहतील. पण दिल्ली संघाचा रविवारी (दि. 11) गुजरात टायटन्सविरुद्ध सामना होणार आहे. ही लढत दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होईल. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू कसे धर्मशाला येथून जेटली स्टेडियमकडे कसे परतणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

तथापि, बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, भारत सरकारकडून कोणतेही आदेश येईपर्यंत आयपीएल सामन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही आणि ते तसेच वेळापत्रकाप्रमाणे खेळवले जातील. मुंबई संघाचे प्रवास वेळापत्रक अजूनही अनिश्चित आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, ‘सध्या सर्व काही अनिश्चित आहे. संघांशी चर्चा सुरू आहे आणि विमानतळ बंद असताना धर्मशालाहून दिल्लीला कसे परतायचे यावरही ते विचार करत आहेत. धर्मशाला ते दिल्ली हा प्रवास बसने केला जाऊ शकतो. पण दिल्ली कॅपिटल्स संघासह चॅनल्सच्या प्रसारण टीम आणि उपकरणासह असा प्रवास कसा केला जाईल याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे.’

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘Operation Sindoor नंतर धर्मशाला येथे आयोजित आयपीएल सामन्यांच्या वेळापत्रकावर चर्चा करावी लागेल. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. चंदीगड विमानतळ देखील बंद करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे काय करावे लागेल याबाबतचा निर्णय बैठकीनंतरच घेतला जाईल. दिल्ली आणि पंजाब हे दोन संघ धर्मशाला येथे पोहोचले आहेत. त्यांचा सामना गुरुवारी होणार आहे. यानंतर येथील मैदानावर मुंबईचा सामन पंजाब विरुद्ध 11 तारखेला खेळला जाणार आहे. सर्वात जवळचा मार्ग दिल्ली आहे परंतु याचा अर्थ संघांना रस्त्याने बराच अंतर प्रवास करावा लागेल. आम्ही सरकारी सल्लागारांशी चर्चा करत आहोत. लवकरच योग्य निर्णय जाहीर करू’

मुंबई इंडियन्सच्या कार्यक्रमात बदल होऊ शकतो. त्यांनी त्यांची तिकिटे रद्द केली आहेत की नाही हे आत्ताच सांगणे कठीण आहे पण जर परिस्थिती बदलली नाही तर असे होण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्यात धर्मशाला येथे दोन सामने होणार आहेत आणि भारतीय हवाई क्षेत्राची स्थिती लक्षात घेता, क्रिकेट बोर्डाला लवकरच इतर व्यवस्था करावी लागेल. हार्दिक पंड्याची टीम सध्या मुंबईत आहे आणि सूचनांची वाट पाहत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT