no misuse in the name of workload bcci issues strict warning to players
भारतीय क्रिकेटमधील ‘स्टार संस्कृती’ला नवे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. ‘वर्कलोड मॅनेजमेंट’च्या नावाखाली महत्त्वाच्या मालिकांमधून माघार घेणार्या खेळाडूंची मनमानी आता खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश ‘बीसीसीआय’ने दिला आहे. इंग्लंड दौर्यात मोहम्मद सिराजने दाखवलेल्या अविश्वसनीय तंदुरुस्ती आणि कामगिरीमुळे व्यवस्थापनाचे हात बळकट झाले आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सिराजने तब्बल 185.3 षटके टाकली. त्याची ही अथक मेहनत आता संघातील इतर खेळाडूंसाठी एक मापदंड बनली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बीसीसीआय’चे पदाधिकारी, प्रशिक्षक गंभीर आणि निवड समितीत ‘वर्कलोड’च्या नावाखाली होणार्या खेळाडूंच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यावर एकमत झाले आहे.
एका वरिष्ठ ‘बीसीसीआय’ अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, केंद्रीय करारामध्ये असलेल्या सर्व खेळाडूंना, विशेषतः तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार्यांना आता सामने निवडण्याची मुभा दिली जाणार नाही. ताणतणावाचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहेच; पण त्याच्या नावाखाली महत्त्वाचे सामने चुकवणे स्वीकारले जाणार नाही.