Mumbai Indians IPL 2026 File Photo
स्पोर्ट्स

Mumbai Indians IPL 2026: मुंबई इंडियन्समध्ये 'विभीषण' कोण? ड्रेसिंग रूममधील गुप्त माहिती बाहेर फुटतेच कशी? व्यवस्थापन चिंतेत!

आयपीएल २०२६ मध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्ससमोर आता मैदानावरील अपयशाइतकीच ड्रेसिंग रूममधील गोपनीय माहिती बाहेर जाण्याची समस्या गंभीर बनली आहे.

मोहन कारंडे

Mumbai Indians IPL 2026

मुंबई: आयपीएल २०२६ मध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्ससमोर आता मैदानावरील अपयशाइतकीच ड्रेसिंग रूममधील गोपनीय माहिती बाहेर जाण्याची समस्या गंभीर बनली आहे. संघ व्यवस्थापनाने या 'लीक'चे मूळ शोधले असून, संघातील व्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी, काही मोजक्या 'स्टार' खेळाडूंशी थेट चर्चा होण्याची शक्यता आहे.

आयपीएलमधील पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी या वर्षीचा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. मात्र संघाची घसरण केवळ मैदानावरील कामगिरीपुरती मर्यादित नसून, ड्रेसिंग रूममधील अंतर्गत मतभेद आणि गोपनीय माहिती सातत्याने बाहेर जाण्यामुळे संघ व्यवस्थापन चिंतेत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्माकडून हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद गेल्यानंतर संघातील वातावरण ढवळून निघाले. मतभेद प्रत्येक संघात असतात, मात्र मुंबई इंडियन्समधील गटबाजी आणि नाराजीचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढल्याचे सांगितले जात आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ला एका सूत्राने सांगितले की, "मुंबई इंडियन्स हा नेहमीच आपल्या मुख्य गटाला महत्त्व देणारा संघ राहिला आहे. ड्रेसिंग रूममध्ये यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडू, कर्णधार बदल आणि मोठे निर्णय झाले, पण अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. संघातील गोपनीय चर्चा सातत्याने बाहेर जाणे ही मोठी चिंता आहे."

गेल्या तीन हंगामांत ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. संघ बैठकीतील चर्चा, महत्त्वाच्या खेळाडूंविषयी आखलेली रणनीती आणि अंतर्गत निर्णय अल्पावधीतच सार्वजनिक होत असल्याचे व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले आहे. यापूर्वी काही खेळाडूंनी सोशल मीडियावर केलेल्या रहस्यमय इमोजी पोस्टमुळे संघातील मतभेदांची चर्चा रंगली होती. त्यानंतर निर्माण झालेला वाद अजूनही थांबलेला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मैदानावरील खेळाडूंची देहबोली, ड्रेसिंग रूममधील गटबाजी आणि संघाची एकूण खेळण्याची पद्धत यावरून समस्या स्पष्टपणे दिसून येतात. काही खेळाडू संघापेक्षा वैयक्तिक गोष्टींना अधिक महत्त्व देत असल्याची भावना व्यवस्थापनात आहे. दुखापतीतून पुनरागमन करण्यासही अनेक खेळाडू अपेक्षेपेक्षा अधिक वेळ घेत आहेत," असे सूत्रांनी सांगितले.

मुंबई इंडियन्स प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर नेतृत्वाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र संघाच्या घसरणीमागे केवळ कर्णधारपदाचा मुद्दा नसून, अनेक अंतर्गत समस्या कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. येत्या काही महिन्यांत, वरिष्ठ खेळाडू त्यांच्या विश्रांतीनंतर आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सहभागानंतर परतल्यावर, काही कठीण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. परंतु, सध्या व्यवस्थापनाचे पहिले लक्ष्य ड्रेसिंग रूममधून बाहेर फुटणाऱ्या गोपनीय माहितीच्या समस्येवर आहे. व्यवस्थापनाने या समस्येचे मूळ शोधले असून, फ्रँचायझीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT