Mohammad Amir statement on India Vs West Indies match
मुंबई : भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणार नाही, असे भाकीत केल्या पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रोल होत आहे. टीम इंडियाने सुपर-८ मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. आता आपली चूक मान्य करण्याऐवजी आमिरने एका नव्या वादाला तोंड फोडले असून, वेस्ट इंडिजच्या एका फलंदाजाला चुकीच्या पद्धतीने बाद दिल गेल्याचा दावा त्याने केला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात १२ व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर हेटमायर यष्टीरक्षक संजू सॅमसनकडे झेल देऊन बाद झाला. पंचांनी फलंदाजाला बाद दिले, मात्र हेटमायर समाधानी नसल्याने त्याने रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये चेंडूचा बॅटला स्पर्श झाल्याचे दिसले, परंतु आमिरच्या मते तो बाद नव्हता. पाकिस्तानमधील एका टॉक शोमध्ये बोलताना आमिर म्हणाला, "मला वाटते हेटमायरला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त होता. तो बाद नव्हता. आणखी काही षटके त्याने फलंदाजी केली असती तर वेस्ट इंडिजची धावसंख्या २२०-२३० पर्यंत पोहोचली असती. भारत विश्वचषकातून बाहेर झाला असता."
या सामन्यात ५० चेंडूत ९७ धावांची वादळी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनची आमिरने प्रशंसा केली. "संजूने त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी केली. बाद फेरीच्या दबावाखाली त्याने खेळलेला हा डाव खरोखरच विशेष होता," असे आमिर म्हणाला.
भारताच्या कमकुवत बाजूंकडे बोट दाखवताना आमिर पुढे म्हणाला की, "तुम्ही म्हणताय की भारताने मला चुकीचे सिद्ध केले, पण त्यांचे क्षेत्ररक्षण पहा. त्यांनी ३-४ झेल सोडले. बुमराहचा अपवाद वगळता प्रत्येक गोलंदाजाची धुलाई होत आहे. भारतीय संघ सध्या केवळ एका गोलंदाजाच्या जोरावर खेळत आहे."