Jasprit Bumrah First Wicket IPL 2026: मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात मुंबई इंडियन्सवर प्रचंड दबाव होता. मुंबईचे दिग्गज खेळाडू आपल्या लौकिकास साजेसा खेळ करू शकत नव्हते. कर्णधार हार्दिक पांड्याने देखील आता कटू निर्णय घेण्याची वेळ आली आहे असं म्हणत एकप्रकारे निर्वाणीचा इशारा दिला होता. अखेर मुंबईने गुजरातवर विजय मिळवत आपली पराभवाची मालिका खंडित केली.
गुजरातविरूद्धच्या सामन्यात विजयासोबतच मुंबईला दोन दिलासे मिळाले. एक म्हणजे त्यांचा मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा हा फॉर्ममध्ये परतला असून त्याने तडाखेबाज शतकी खेळी करत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयपीएलमधील आपल्या विकेटचा दुष्काळ संपवत खातं उघडलं.
जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचं झालं तर गेल्या सहा सामन्यापासून त्याला विकेट घेण्यात यश येत नव्हतं. अखेर त्याने साई सुदर्शनला गुजरातच्या पहिल्याच चेंडूवर बाद करत हा दुष्काळ संपवला. मुंबईने ठेवलेल्या २०० धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या गुजरातला या पहिल्या धक्क्यानंतर सावरताच आळे नाही. त्यांना मुंबईने ९९ धावांनी पराभूत केलं. मुंबईच्या या विजयामुळं हंगामातील त्यांचा मूडच चेंज झाला आहे.
प्रत्येक विकेटचे एक मुल्य असतंच मात्र काही विकेट्स या खूप खास असतात. काही विकेट्स या आधीच नुकसान झालेलं असतं त्यात पडतात. तर काही विकेट्स या सामन्याचं चित्र पालटतात. मात्र बुमराहच्या या पहिल्या विकेटचा थाट काही औरच आहे.
साई सुदर्शन हा गुजरातचा एक महत्वाचा खेळाडू आहे. २०० धावांच्या रन चेसमध्ये त्याची विकेट ही बहूमोल ठरते. कारण ही विकेट गुजरातला श्वास घेण्याची संधी मिळणार की नाही हे ठरवणारी होती. मानसिकदृष्ट्या देखील जसप्रीत बुमराहसाठी ही विकेट अत्यंत दिलासा देणारी ठरली.
बॉल लेव्हल डेटानुसार जसप्रीत बुमराहची किंमत करायची झाली तर एका वेगळ्या कॅलक्युलेशननुसार त्याचा त्या सामन्यातील बॉल इम्पॅक्ट हा १५.४४९ इतका आहे. याची पैशात मोजदाद करायची झाली तर त्याने टाकलेला एक चेंडू हा जवळपास २५ लाख रूपये किंमतीचा असतो.
यासाठी सामन्याची पार्श्वभूमी महत्वाची आहे. मुंबईने असा काही धावांचा डोंगर उभा केला नव्हता. त्यांना फक्त १९९ धावा डिफेंड करायच्या होत्या. प्रतिस्पर्धी संघ हा रन चेस करण्याइतका शक्तीशाली होता. मात्र बुमराहने विकेट घेतली तर त्यांच्या या रन चेसला चाप बसणार होता. सुरूवातीला सामना गुजरातच्या नियंत्रणार न राहता ते पराभवाच्या दिशेने कूच करू लागले. याला जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर घेतलेली विकेट कारणीभूत ठरली. त्यामुळेच या विकेटचे मुल्य हे मोठे होते.
जसप्रीत बुमराहच्या या विकेटला एक वेगळी पार्श्वभूमी देखील आहे. बुमराहची ही आयपीएल २०२६ च्या हंगामातील पहिली विकेट आहे. त्याने गेल्या आयपीएलमध्ये ३० मे २०२५ रोजी विकेट घेतली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये त्याला विकेट घेणं जमलं नव्हतं. तब्बल ३२५ दिवसांनी बुमराहचा विकेटचा कॉलममधील शुन्य नाहिसा झाला.