पुढारी ऑनलाईन डेस्क | Womens Asia Cup : भारतीय महिला क्रिकेट संघाने मंगळवारी (दि.23) आशिया चषक 2024 च्या तिसऱ्या सामन्यात नेपाळचा पराभव करत विजयाची हॅटट्रिक साधली. यासह आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा 82 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 3 गडी गमावून 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ 9 गडी गमावून केवळ 96 धावा करू शकला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर शेफाली वर्मा आणि दयालन हेमलता यांनी पहिल्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेमलता बाद झाली. तिने 42 चेंडूत 47 धावा केल्या. त्यांच्याशिवाय शेफाली वर्माने 48 चेंडूत 81 आणि एस सजना हिने 10 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्स 28 धावांवर आणि रिचा घोष 6 धावांवर नाबाद राहिल्या. नेपाळकडून गोलंदाजीमध्ये सीता राणा मगरने 2 तर कविता जोशीने 1 विकेट घेतली.:
भारताने दिलेल्या 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेपाळी संघाची सुरुवात खराब झाली. फलंदाजीत ठराविक अंतराने नेपाळचा संघ विकेट गमावत राहिला. फलंदाजीमध्ये समझा खडकाने 7 चेंडूत 7 धावा केल्या. तिच्याशिवाय कविता कुंवरने 6, कर्णधार इंदू बर्माने 14, सीता राणा मगरने 18, रुबिना छेत्रीने 15, कविता जोशीने 0, पूजा महातोने 2, डॉली भट्टाने 5, काजल श्रेष्ठने 5 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने 3 बळी घेतले. भारताकडून गोलंदाजीमध्ये अरुंधती रेड्डी आणि राधा यादव यांना प्रत्येकी 2 यश मिळाले. तसेच रेणुका सिंह ठाकूर यांनी 1 विकेट घेतली.