पुढारी ऑनलाईन डेस्क : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. त्याचा पहिला सामना रविवारी (दि,६) ग्वालिअरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी शानदार खेळ करत 7 गडी राखून विजय मिळवला आहे. IND vs BAN
या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बांगलादेश संघाने भारतासमोर 128 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 11.5 षटकांत 3 गडी गमावून सामना जिंकला. भारतीय संघासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने 14 चेंडूत 29 धावा केल्या आणि संजू सॅमसनने 19 चेंडूत 29 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने तुफानी फटकेबाजी करत 16 चेंडूत नाबाद 39 धावा कुटल्या. तर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या नितीश कुमार रेड्डी याने 15 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या. मुस्तफिजुर रहमान आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.
पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आमंत्रण दिले होते. यावेळ भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले. बांगलादेशने पहिल्या षटकात 5 धावांत एक विकेट गमावली. अर्शदीप सिंगने लिटन दासला आपला शिकार बनवले. यानंतर बांगलादेशला 14 धावांवर दुसरा धक्का बसला. अर्शदीप सिंगने परवेझ हुसैन इमॉनला क्लीन बोल्ड केले. यानंतर बांगलादेश संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला आणि त्यांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली नाही. अशाप्रकारे यजमान संघाला केवळ 127 धावा करता आल्या.
संघाकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक नाबाद 35 धावा केल्या आणि कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 27 धावा केल्या. संपूर्ण सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा कायम ठेवला. संघाकडून फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३-३ बळी घेतले. हार्दिक पांड्या, मयंक यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 1-1 विकेट घेतली.