ग्वाल्हेर; वृत्तसंस्था : भारताविरुद्ध रविवारी ग्वाल्हेरला होत असलेल्या पहिल्या टी20 सामन्यात बांगलादेशचा संघ 19.5 षटकात सर्वबाद 127 धावा केल्या. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 128 धावांचे आव्हान असणार आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशकडून परवेझ हुसैन इमॉन आणि लिटन दास यांनी डावाची सुरुवात केली. पण त्यांना फार वेळ खेळट्टीवर टिकता आले नाही. अर्शदीपने या दोघांनाही स्वस्तात बाद केले. अर्शदीपने रिंकु सिंगच्या हातून आधी लिटन दास 4 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर तिसर्या षटकात अर्शदीपने परवेझला 8 धावांवर त्रिफळाचीत केले.
कर्णधार नजमुल हुसैन शांतोने तौहिद हृदोयच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची भागीदारी रंगत असतानाच वरुण चक्रवर्तीने तौहिद हृदोयला 12 धावांवर हार्दिक पंड्याच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर लगेचच महमुद्दलाला मयंक यादवने 1 धावंवरच बाद करत पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळवली. त्यानंतर पाचवा धक्का वरुण चक्रवर्तीने जाकर अलीला त्रिफळाचीत करून दिला. त्याने 8 धावा केल्या. त्यानंतर लगेचच कर्णधार नजमुल हुसैन शांतोची झुंज वॉशिंग्टन सुंदरने त्याच्याच गोलंदाजीवर झेल घेत संपवली. रिशाद हुसैनलाही वरुण चक्रवर्तीने 11 धावांवर बाद केले, तर तस्किन अहमदला अर्शदीप आणि हार्दिक पंड्याने मिळून 12 धावांवर धावबाद केले.