पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने पाचव्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला. यासह भारताने पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली आहे. हरारे येथे रविवारी (दि.14) झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 167 धावा केल्या. भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 58 धावा केल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्येच संघाने तीन गडी गमावले. यशस्वी जैस्वाल 5 चेंडूत 12 धावा करून बाद झाला, अभिषेक शर्मा 11 चेंडूत 14 धावा करून बाद झाला आणि कर्णधार शुभमन गिल 14 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. यानंतर संजू सॅमसन आणि रायन यांच्यात चौथ्या विकेटसाठी ५६ चेंडूत ६५ धावांची भागीदारी झाली. रियान पराग 24 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. संजू सॅमसन 45 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने चार षटकार आणि एक चौकार लगावले.
168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली. मुकेश कुमारने वेस्लीला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. ब्रायनला 8 चेंडूत केवळ 10 धावा करता आल्या. मारुमणीने 24 चेंडूत 27 धावांची खेळी खेळली. डायन मायर्स 32 चेंडूत 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सिकंदर रझा 8 धावांवर धावबाद झाला. कॅपबेलने 4 धावा केल्या. क्लाइव्हला एकच धाव करता आली. भारतीय संघात गेल्या सामन्यात दोन बदल करण्यात आले आहेत. रियान पराग आणि मुकेश कुमार यांना स्थान मिळाले आहे. खलील अहमद आणि रुतुराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. झिम्बाब्वेने एक बदल केला आहे. ब्रेंडन मावुताचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला होता मात्र त्यानंतर संघाने जोरदार पुनरागमन करत सलग तीन सामने जिंकून मालिका जिंकली.