Surya kumar Yadav Statement Over Pahalgam Terror Attack :
भारतानं आशिया कप २०२५ मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला १२७ धावात गुंडाळलं. त्यानंतर हे आव्हान तीन फलंदाजांच्या मोबदल्यात. १५.३ षटकात पार करत आपला सगल दुसरा विजय साजरा केला.
यंदाचा भारत - पाकिस्तान सामना हा इतरवेळेच्या भारत पाक सामन्यासारखा नव्हता. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची त्याला पार्श्वभूमी होती. भारतातून हा भारतानं या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी जोरदार मागणी होती.
दरम्यान, भारतानं हा सामना जिंकल्यावर कर्णधार सूर्य कुमार यादवनं एक मोठं वक्तव्य दिलं. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सूर्या म्हणाला, 'पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची यापेक्षा चांगली वेळ नाही. आम्ही आजचा हा विजय आमच्या सर्व सशस्त्र दलांना समर्पित करतो. त्यांनी कायमच आपल्या शूरतेचं दर्शन घडवलं आहे. आशा आहे की ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहतील. आम्ही देखील त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी मैदानावर सतत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.'
यंदाच्या भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी खूप राजकीय चर्चा झाली होती. दोन्ही देशांमध्ये सध्या खूप तणावाचं वातावरण आहे. एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा जीव गेला. त्यानंतर मे महिन्यात भारतीय सुरक्षा दलांनी ऑपरेशन सिंदूर लाँच करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली होती. यानंतर दोन्ही देशांच्या लष्करामध्ये चकमकी उडाल्या. अखेर पाकिस्तानच्या विनवणीनंतर भारत तणाव कमी करण्यास तयार झाला.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर होत असलेल्या भारत - पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, 'हा आमच्यासाठी फक्त एक सामना होता.' तो पुढे म्हणाला, 'भारताला हे उत्तम रिटर्न गिफ्ट आहे. काही गोष्टी मनात होत्या. त्या मानवी स्वभावाप्रमाणं असणारच. आम्ही जिंकण्यासाठीच प्रयत्नशील होतो. मी कायम शेवटपर्यंत फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो.'
सूर्या म्हणाला, 'संपूर्ण संघाबद्दल बोलायचं झालं तर आम्ही या सामन्याकडे फक्त अजून एक सामना अशा दृष्टीकोणातूनच पाहिलं. आम्ही ज्याप्रमाणे इतर विरोधी संघांविरूद्ध तयार करतो तशीच तयारी या सामन्याची देखील केली होती. आम्ही काही महिन्यांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून एक टोन सेट केला होता. तोच आता पुढे नेत आहोत. मी कायमच फिरकीपटूंचा चाहता राहिलो आहे. कारण ते सामन्यावर चांगलं नियंत्रण मिळवू शकतात.'