स्पोर्ट्स

Rishabh Pant Ruled Out : ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे इशान किशनला मिळणार भारतीय संघात एन्ट्री! ओव्हल कसोटीत खेळणार?

उपकर्णधार पंत कसोटी मालिकेतून जवळपास बाहेर पडण्याची दाट शक्यता; फ्रॅक्चरमुळे किमान सहा आठवड्यांची सक्तीची विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

रणजित गायकवाड

Rishabh Pant suffers fractured toe ruled out of Ind vs Eng Test series

मँचेस्टर : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यादरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यामुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला असल्याचे समोर आले आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला किमान सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. तथापि, संघाची गरज लक्षात घेता, वेदनाशामक इंजेक्शन घेऊन तो दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी, ऋषभ पंत 37 धावांवर फलंदाजी करत असताना ही घटना घडली. वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू थेट त्याच्या उजव्या पायाच्या करंगळीवर आदळला. यानंतर पंत तीव्र वेदनेने विव्हळत असल्याचे दिसून आले. मैदानावर आलेल्या फिजिओने तपासणी केली असता, पंतच्या पायातून रक्तस्राव होत असल्याचे आणि वेदना तीव्र असल्याचे निदर्शनास आले, ज्यामुळे त्याला ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन मैदान सोडावे लागले. दिवसभराचा खेळ संपल्यानंतर पंतला स्कॅनसाठी नेण्यात आले, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, ‘क्रिकबझ’ने दिलेल्या वृत्तानुसार पंतच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले आहे. या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी त्याल सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. असे असले तरी, पंत अद्याप संघासोबतच आहे. दुखापतग्रस्त पायावर भार देऊ शकत नसल्याने सामन्यातील त्याच्या पुढील उपलब्धतेवर गंभीर शंका आहे. तथापि, वेदना असूनही तो फलंदाजीस उत्सुक असून, प्रकृतीत सुधारणा वाटल्यास दुसऱ्या डावात मैदानात उतरू शकतो, असेही या वृत्तात म्हटले आहे.

पंतच्या अनुपस्थितीत, सध्या सुरू मँचेस्टर कसोटी सामन्यात ध्रुव जुरेल यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. संघात एक खेळाडू कमी असल्याने, गरज पडल्यास पंत वेदनाशामक इंजेक्शन घेऊन फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतो का, याची चाचपणी करण्याची विनंती भारतीय संघ व्यवस्थापनाने वैद्यकीय पथकाकडे केली आहे. तथापि, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याची शक्यता अत्यंत कमी आहे.

विशेष म्हणजे, लॉर्ड्स येथे झालेल्या मागील कसोटी सामन्यातही पंतच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यावेळी त्याने यष्टीरक्षण केले नव्हते, मात्र त्याने फलंदाजी केली होती.

पंत जायबंदी झाल्यामुळे या मालिकेत भारतीय संघाच्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या वाढत्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. नितीश कुमार रेड्डी यापूर्वीच मालिकेतून बाहेर झाला आहे, तर वेगवान गोलंदाज आकाश दीप (पाठदुखी) आणि अर्शदीप सिंग (बोटाची दुखापत) चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी मिळाली.

दरम्यान, मालिकेतील अखेरच्या, ओव्हल येथे होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनला संघात स्थान दिले जाण्याची दाट शक्यता आहे. या निवडीमुळे, तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर इशान किशनचे कसोटी संघात पुनरागमन होईल.

दोन वर्षांनंतर कसोटी संघात परतणार

पंत अंतिम कसोटी सामन्याला मुकणार असल्याने, निवड समिती पाचव्या कसोटीपूर्वी संघात इशान किशनचा समावेश करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना 31 जुलै ते 4 ऑगस्ट 2025 या कालावधीत ओव्हल येथे खेळवला जाईल.

या निवडीमुळे इशान किशनचे सुमारे दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार आहे. इतकेच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्यांचे जवळपास 20 महिन्यांनंतर पुनरागमन ठरेल. इशान किशनने भारताकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 28 नोव्हेंबर 2023 रोजी खेळला होता, जो एक टी-20 सामना होता. तर, आपला अखेरचा कसोटी सामना त्यांनी जुलै 2023 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT