Abhishek Sharma T20 World Cup Semi Final Selection Debate:
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला असला तरी सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्पर्धेपूर्वी आयसीसी क्रमवारीत टी-20 फॉरमॅटमध्ये अव्वल फलंदाज असलेला अभिषेक या स्पर्धेत मात्र अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या उपांत्य सामन्यापूर्वी त्याला संघातून वगळावे का, यावर चर्चा सुरू झाली आहे.
अभिषेक शर्माने 2024 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यात भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता, मात्र पुढच्याच सामन्यात त्याने शानदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने भारतीय संघात सलामीवीर म्हणून आपली जागा पक्की केली.
2025 वर्ष अभिषेकसाठी अत्यंत यशस्वी ठरले. आशिया कपमध्ये त्याने सात सामन्यांत 314 धावा करत स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. सरासरी 44.86 आणि स्ट्राइक रेट 200 च्या आसपास होता. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कारही मिळाला. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतही त्याने दमदार कामगिरी केली. पाच डावांत त्याच्या 182 धावा, 45.50 सरासरी आणि तब्बल 249.32 स्ट्राइक रेट होता.
मात्र टी-20 विश्वचषक सुरू झाल्यानंतर अभिषेकचा फॉर्म अचानक घसरला. सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 18 चेंडूत 24 धावा करून तो आउट झाला. मुख्य स्पर्धेत अमेरिकेविरुद्ध पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. पाकिस्तानविरुद्धही तो चार चेंडूत शून्यावर बाद झाला. नेदरलँड्सविरुद्धही त्याला मोठी खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने 12 चेंडूत 15 धावा केल्या.
झिम्बाब्वेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात मात्र अभिषेकने 30 चेंडूत 55 धावांची दमदार खेळी केली. चार चौकार आणि चार षटकारांसह त्याने भारताला महत्त्वाचा विजय मिळवून दिला. या खेळीनंतर त्याचा आत्मविश्वास परत येईल अशी अपेक्षा होती.
मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तो पुन्हा अपयशी ठरला. त्याने दोन सोपे कॅच सोडले आणि फलंदाजीत 11 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. स्पिनर अकील होसेनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.इशान किशन
आता मोठा प्रश्न असा आहे की इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात अभिषेकला संघातून वगळावे का? मोठ्या स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात संघात मोठे बदल करणे सहसा टाळले जाते. वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार नाबाद 97 धावा करणाऱ्या संजू सॅमसनला सलामीला पाठवण्याचा पर्याय संघाकडे आहे. त्याच्यासोबत इशान किशन फलंदाजीला येऊ शकतो.
रिंकू सिंगलाही संघात स्थान देण्याचा पर्याय आहे. मात्र या स्पर्धेत त्याने विशेष कामगिरी केलेली नाही. दुसरीकडे हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांसारखे फिनिशर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
उपांत्य सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल मानली जाते. जर अभिषेक शर्मा लयीत आला तर इंग्लंडच्या गोलंदाजांना तो घाम फोडू शकतो. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनासाठी हा मोठा निर्णय असणार आहे. फॉर्म नसलेल्या खेळाडूला संधी द्यायची की निर्णायक सामन्यात संघात बदल करायचा.
इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीसाठी भारताची संभाव्य Playing XI: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह