India T20 World Cup Final 2026 Pudhari
स्पोर्ट्स

T20 World Cup: भारत सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये; फक्त दोन संघांनी यापूर्वी केला विक्रम, पाकिस्तानही यादीत

India T20 World Cup Final 2026: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला ७ धावांनी हरवत टी20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारत सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे.

Rahul Shelke

India T20 World Cup Final 2026: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने इंग्लंडवर थरारक विजय मिळवत टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विजयासह भारताने एक महत्त्वाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा भारत हा इतिहासातील तिसरा संघ ठरला आहे.

सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात जबरदस्त लढत पाहायला मिळाली. भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर २५४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडनेही जोरदार प्रयत्न केले. इंग्लिश फलंदाजांनी अखेरपर्यंत झुंज दिली आणि २४६ धावांपर्यंत मजल मारली. मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या क्षणी धैर्य राखत इंग्लंडला रोखले आणि भारताने हा सामना अवघ्या ७ धावांनी जिंकला. या थरारक विजयासह भारताने अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले.

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सलग दोन अंतिम सामने खेळण्याचा पराक्रम यापूर्वी फक्त दोन संघांनी केला होता. पाकिस्तान आणि श्रीलंका हे त्या यादीत आहेत. पाकिस्तानने २००७ आणि २००९ या सलग दोन विश्वचषकांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. २००७ मध्ये भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र २००९ मध्ये पाकिस्तानने शानदार कामगिरी करत विश्वचषक जिंकला होता.

यानंतर श्रीलंकेनेही हा विक्रम केला. श्रीलंका २०१२ आणि २०१४ या दोन विश्वचषकांच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. २०१२ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, मात्र २०१४ मध्ये श्रीलंकेने भारताला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. आता या यादीत भारताचे नाव जोडले गेले आहे.

भारताने यापूर्वी २०२४ च्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले होते. त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून ट्रॉफी जिंकली होती. आता दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत आपली जागा आधीच निश्चित केली आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात दोन मजबूत संघ आमनेसामने येणार आहेत.

८ मार्च रोजी होणाऱ्या या अंतिम सामन्यात भारताकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. भारताने जर न्यूझीलंडला पराभूत केले तर टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सलग दोनदा विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच देश ठरेल. यापूर्वी कोणत्याही संघाला हा पराक्रम करता आलेला नाही.

इतकेच नव्हे तर भारताने जर हा अंतिम सामना जिंकला तर आणखी एक ऐतिहासिक विक्रम नोंदवला जाईल. भारत आपल्या घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिलाच देश ठरेल. त्यामुळे हा सामना केवळ एका ट्रॉफीसाठी नसून इतिहास घडवण्याची संधी आहे.

भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फलंदाजांची आक्रमकता आणि गोलंदाजांची अचूकता यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने आक्रमक क्रिकेट खेळत अंतिम फेरी गाठली आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष ८ मार्चकडे लागले आहे. भारतीय संघ इतिहास रचतो की न्यूझीलंड बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT