स्पोर्ट्स

T20 World Cup Final : शिवम दुबेच्या ‘रन आऊट’मध्ये लपलाय विश्वविजेतेपदाचा फॉर्म्युला! काय आहे २००७ चा ‘तो’ अद्भूत योगायोग?

IND vs NZ Final : धोनीच्या पावलावर पाऊल.. Final मध्ये टीम इंडियासाठी विजयाचे 'शुभसंकेत'

रणजित गायकवाड

T20 World Cup 2026 IND vs NZ Final Shivam Dube Run Out Team India will win world cup 2007 and MS Dhoni Coincidence

अहमदाबाद : टी-२० विश्वचषक २०२६ च्या थरारक उपांत्य लढतीत इंग्लंडचा ७ धावांनी धुव्वा उडवत भारतीय संघाने दिमाखात फायनल गाठली आहे. या निर्णायक सामन्यात अष्टपैलू शिवम दुबेने ४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, मात्र दुर्दैवीरीत्या तो धावबाद झाला. दुबेच्या या 'रन आऊट'ने क्रिकेट जगतात एका विलक्षण योगायोगाला जन्म दिला असून, हा शुभसंकेत भारताला पुन्हा एकदा विश्वविजेतेपदाकडे घेऊन जाणार असल्याची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी (५ मार्च) रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फलंदाजांनी अक्षरशः मैदान गाजवले. दोन्ही संघांच्या तुफानी फटकेबाजीमुळे ४० षटकांत एकूण ४९९ धावांचा पाऊस पडला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २५३ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेही चोख प्रत्युत्तर दिले, मात्र त्यांची झुंज २४६ धावांवरच मर्यादित राहिली.

या लढतीत भारतीय संघाने फलंदाजीच्या क्रमात रणनीतिक बदल करत शिवम दुबेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी धाडले. मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा उठवत दुबेने अवघ्या २५ चेंडूंत १ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ४३ धावांची वादळी खेळी साकारली. मात्र, धाव घेताना हार्दिक पंड्या आणि त्याच्यातील समन्वयाचा अभाव नडला आणि या गोंधळात दुबेला आपली विकेट गमवावी लागली. दुबे दुर्दैवीरीत्या धावबाद झाला असला, तरी त्याच्या या 'रन आऊट' होण्याने भारतीय चाहत्यांच्या मनात विश्वविजेतेपदाच्या आशा पुन्हा एकदा जागवल्या आहेत.

दुबेने केली धोनीची बरोबरी

या घटनेने २००७ च्या टी-२० विश्वचषकाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. २००७ मध्ये जेव्हा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्वचषक उंचावला होता, तेव्हा त्या संपूर्ण स्पर्धेत धोनी तीन वेळा धावबाद झाला होता. विशेष म्हणजे, यंदाच्या विश्वचषकात शिवम दुबे देखील आतापर्यंत तीन वेळा धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. एकाच टी-२० विश्वचषकात सर्वाधिक वेळा धावबाद होण्याच्या बाबतीत आता दुबेने धोनीची बरोबरी केली आहे. हा योगायोग पाहता, शिवम दुबेचे तीन वेळा धावबाद होणे भारतीय संघासाठी विश्वविजेतेपदाचा 'लकी चार्म' ठरेल, अशी चर्चा रंगली आहे.

अंतिम फेरीत दुबेवर मोठी जबाबदारी

टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत भारताला न्यूझीलंडवर विजय मिळवता आलेला नाही, त्यामुळे हे आव्हान मोठे असेल. अशा स्थितीत शिवम दुबेवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. दुबेची न्यूझीलंडविरुद्धची आकडेवारी पाहिल्यास, त्याने १० आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत २६.३३ च्या सरासरीने १५८ धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच, अंतिम सामना होणाऱ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुबेची कामगिरी प्रभावी राहिली असून, तेथे त्याने ३ सामन्यांत ५९ च्या सरासरीने ११८ धावा फटकावल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT