IND vs ENG Semi Final Toss Importance Pudhari
स्पोर्ट्स

IND vs ENG Semi-Final: भारत-इंग्लंड सेमीफायनलमध्ये टॉस ठरणार निर्णायक? आकडेवारी काय सांगते?

T20 World Cup Trend: टी-20 विश्वचषकाच्या भारत-इंग्लंड सेमीफायनलमध्ये टॉस निर्णायक ठरू शकतो, अशी चर्चा आहे. मागील स्पर्धांमध्ये नॉकआउट सामन्यांमध्ये टॉस जिंकणाऱ्या संघानेच विजय मिळवल्याचा ट्रेंड आहे.

Rahul Shelke

IND vs ENG Semi Final Toss Importance T20 World Cup: टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात आज भारत आणि इंग्लंड आमनेसामने येणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दोन्ही संघ टी-20 विश्वचषकावर लक्ष ठेवून मैदानात उतरणार आहेत.

मात्र या सामन्यापूर्वी एक वेगळाच ट्रेंड चर्चेत आला आहे. टी-20 विश्वचषकातील नॉकआउट सामन्यांमध्ये टॉस जिंकणाऱ्या संघाला मोठा फायदा होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. त्यामुळे या सामन्यात टॉस निर्णायक ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

2016 वर्ल्ड कपमधील ट्रेंड

भारताने यापूर्वी 2016 मध्ये टी-20 विश्वचषकाचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेतील सर्व नॉकआउट सामन्यांमध्ये टॉस जिंकणाऱ्या संघानेच विजय मिळवला होता.

पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि न्यूझीलंडचा पराभव केला. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकत भारताला 7 विकेट्सने हरवले. त्यानंतर फायनलमध्येही वेस्ट इंडिजने टॉस जिंकून इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले.

2026 मध्येही तोच ट्रेंड?

सध्याच्या विश्वचषकातही हा ट्रेंड कायम असल्याचे दिसत आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेला 9 विकेट्सने हरवत अंतिम फेरी गाठली. यामुळे भारत-इंग्लंड सामन्यात टॉसचे महत्त्व आणखी वाढले आहे.

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. मात्र संध्याकाळच्या सामन्यात ड्यु फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. ड्युमुळे गोलंदाजांना चेंडू पकडणे कठीण जाते आणि फलंदाजांना खेळणे सोपे होते. म्हणूनच अनेक संघ टॉस जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात.

नाईट मॅचचा खास ट्रेंड

2014 पासून टी-20 विश्वचषकातील नॉकआउट सामने पाहिले तर बहुतेक रात्रीच्या सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या कालावधीत फक्त दोन वेळाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला असून ते दोन्ही सामने दिवसा खेळले गेले होते. या पार्श्वभूमीवर आजच्या भारत-इंग्लंड सेमीफायनलमध्ये टॉसची भूमिका किती निर्णायक ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT